खव्यापासून बर्फी, पेढा, गुलाबजामून, कलाकंद, कुंदा इ. पदार्थ तयार करता येतात. खवा बनविण्याच्या पारंपरिक पद्धतीत मंद आचेवर दूध तापवत ठेवून सतत ते हलवत राहावे लागते. दूध चांगले घट्ट झाल्यावर तापमान 80 ते 88 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आणले जाते. जेव्हा खवा कढईचा आजूबाजूचा व तळाचा भाग सोडेल आणि एकत्र चिकटू लागेल तेव्हा खवा तयार झाला असे समजावे. पण या पद्धतीत वेळ जास्त लागतो.
खवानिर्मिती यंत्र
खवानिर्मिती यंत्र हे गॅस मॉडेल व डिझेल मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. बहुतांशी ठिकाणी गॅस मॉडेलचाच वापर होतो. हे यंत्र वेगवेगळ्या क्षमतेचे आहे. यंत्र खरेदी करताना “जार क्षमता’ ध्यानात न घेता जास्तीत जास्त किती व कमीत कमी किती खवा बनविता येईल याचा विचार करावा.
खवा बनविण्याच्या संपूर्ण प्रक्रियेस 60 ते 70 मिनिटे लागतात. प्रति किलो खव्यास नऊ ते दहा रु. खर्च (गॅस, वीज) येतो. डिझेल मॉडेलसाठी हा खर्च 16 ते 17 रु. प्रति किलो एवढा येतो. या यंत्रामध्ये मोठे गोलाकार भांडे 0.5 एच.पी. मोटारच्या साह्याने गोल फिरते. भांड्यातच असणाऱ्या दोन स्क्रॅपरच्या साह्याने दूध भांड्याच्या पृष्ठभागास व कडेस लागत नाही. फक्त आचेवर नियंत्रण ठेवावे लागते. मोठ्या चौकोनी चमच्याने (सुपडी) दूध खाली-वर करावे लागते. भांड्याला नळ जोडला असल्यामुळे दूध गरम करणे किंवा बासुंदी, खीरसाठी दूध आटवणे या गोष्टीही सहज होतात.
खवा तयार करताना
* खव्यासाठी निर्भेळ दूध वापरावे. * गाईच्या एक लिटर दुधापासून 170 ते 190 ग्रॅम खवा मिळतो. * म्हशीच्या एक लिटर दुधापासून 200 ते 220 ग्रॅम खवा मिळतो. * दुधाची आम्लता 0.14 ते 0.15 टक्का इतकी असावी. * दुधात फॅट कमी असल्यास खवा कोरडा बनतो. * दुधात भेसळ असल्यास खवा कठीण बनतो. * म्हशीच्या दुधापासूनचा खवा पांढरट, तपकिरी छटा असलेला, किंचित तेलकट पृष्ठभाग मृदू, मुलायम, दाणेदार किंचित गोड असा असतो. * गाईच्या दुधापासूनचा खवा फिक्कट पिवळा, तपकिरी छटा असलेला, ओला पृष्ठभाग, किंचित कठीण, खारट असतो.
संपर्क – 9405794668 डॉ. धीरज कंखरे, कृषी महाविद्यालय, धुळे
केळीखोडापासून धागे
केळीखोडापासून धागे
केळीचा घड काढल्यानंतर केळीच्या खोडापासून धागानिर्मिती करणे शक्य आहे. त्यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळू शकेल.
केळीचे खोड लवकर कुजत नसल्यामुळे आंतरमशागतीसाठी अडचणी येतात. मात्र, खोडापासून धागानिर्मितीमुळे ही अडचण दूर होण्यासोबत उत्पन्नही मिळू शकते.
केळी खोडापासून धागानिर्मितीसाठी आवश्यक बाबी
केळी खोडापासून धागा काढणारे यंत्र
कापलेल्या केळीझाडांचे खोड
तीन पुरुष मजूर व २ स्त्री मजूर प्रतिदिवस
विद्युत पुरवठा
केळी खोडापासून धागानिर्मितीची प्रक्रिया
केळी खोडापासून उत्कृष्ट प्रतीचा धागा काढण्यासाठी लाल केळी, नेंद्रन, रस्थाली ह्या जातींचा वापर करतात. महाराष्ट्रात लागवडीखाली असलेल्या अर्धापुरी, ग्रॅन्ड नैन, श्रीमंती, महालक्ष्मी ह्या जातींपासूनही चांगल्या प्रतीचा धागा काढता येतो. धागा काढण्यासाठी फक्त खोडाचाच वापर करता येतो असे नाही, तर घडाच्या दांड्याचा तसेच पानाच्या शिरेचाही करता येतो. परंतु, आर्थिकदृष्ट्या किफायतशीर धागा फक्त खोडापासून बनू शकतो. धागा काढण्यासाठी खोडाचा वापर झाड कापल्यापासून चोवीस तासांच्या आत करावा.
धागा काढणीसाठी तीन माणसांची गरज असते. एक माणूस खोड उभे चिरून त्याचे चार तुकडे करतो. त्यासाठी गुजरात येथील नवसारी कृषी विद्यापीठामध्ये केळीचे खोड कापणी यंत्र तयार केले आहे. हे यंत्र खोडाचे दोन ते चार उभे काप करते. दुसरी व्यक्ती प्रत्यक्ष यंत्रावर धागा काढणीचे काम करते. तिसरी व्यक्ती काढलेला धागा पिळण्याची प्रक्रिया करून धागा दोरीवर वाळत घालते. तसेच प्रक्रियेदरम्यान निघालेले पाणी व लगदा वेगळे करते. दोन स्त्री मजुरांचा वापर सहाय्यक म्हणून होतो.
सुकवलेला धागा मोठ्या दाताच्या फणीने विंचरून घेतल्यास धाग्याची प्रत चांगली मिळते. कुशल कारागीराद्वारे आठ तासांमध्ये २० ते २५ किलो धागा मिळू शकतो. या यंत्राची किंमत अश्वशक्तीनुसार ७० हजार ते १ लाख ७५ हजार रुपये अशी असते. केळी खोडापासून काढलेला धागा एकूण ३ (पहिली, दुसरी व तिसरी) प्रतीत विभागला जातो. यंत्रामधून काढलेले सूत सहसा तिसऱ्या प्रतवारीचे असते. त्याला विंचरून घेतल्यास ते दुसऱ्या प्रतिपर्यंत जाऊ शकते. त्यानंतर लाकडी पाटीने त्यास पॉलिश करून पांढरे शुभ्र झाल्यास पहिल्या प्रतिपर्यंत जाऊ शकते.
धाग्याचा दर
पांढरा शुभ्र धागा – १०० ते १२० प्रतिकिलो
सिल्व्हर शाईन धागा – ८० ते १०० प्रतिकिलो
पिग्मेंट युक्त धागा – ८० रु. किलो
धाग्याची उपयुक्तता
धाग्यापासून बारीक दोरी, दोरखंड, पिशव्या, पाय पुसणी, चटई, आकर्षक टोप्या, कापड, साड्या, शोभेच्या वस्तू, क्राफ्ट पेपर, टिश्यू पेपर, फिल्टर पेपर, पृष्ठ, फाईलसाठी जाड कागद, सुटकेस, डिनरसेट, बुटांचे सोल, चप्पल इत्यादी वस्तू बनविता येतात.
केळी खोडापासून धागा निर्मितीचे फायदे
केळी बागेतील न कुजणारे अवशेष जाळले जातात. त्यामुळे पर्यावरणाच्या ऱ्हासासोबतच जमिनीतील उपयुक्त जिवाणूही नष्ट होतात. त्याचा फटका उत्पादकतेला बसतो.
दुष्काळामध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे घडनिर्मिती न झाल्यास उर्वरीत उभ्या खोडापासून काही प्रमाणात आर्थिक लाभ होऊ शकतो.
केळी खोडापासून धागेनिर्मिती यंत्र व कार्यपद्धती
या यंत्रात दोन रिजिड पाइप बसवले असून, गायडिंग रोलर असतात. या रोलरमुळे केळी खोड आत सरकते. खोडाच्या आकारमानानुसार दोन रिजिड पाइपमधील अंतर कमी-जास्त करता येते. रोलर फिरविण्यासाठी बेल्ट पुली यंत्रणा बसवलेली असते. यासाठी एक एचपी क्षमतेची सिंगल फेज विद्युत मोटर पुरेशी होते.
यंत्राच्या दुसऱ्या बाजूने निघालेले धागे पिळून त्यातील पाणी बाहेर काढले जाते. धागे तारांवर एक दिवस वाळवतात. कोरड्या धाग्यांमध्ये विशिष्ठ प्रकारची फणी फिरवून ते एकमेकांपासून वेगळे करतात.
शेतातून खोडाची वाहतूक, उभे चिरून त्याचे चार तुकडे करणे, यंत्रात भरणे व धागे पिळून काढणे या कामांसाठी पुरुष मजूर लागतात. धाग्यांतून फणी फिरविणे, ते वाळत घालणे या कामांसाठी महिला मजूर लागतात.
काजू टरफल प्रक्रियेबाबत माहिती
काजू टरफल प्रक्रियेबाबत माहिती
काजू बी टरफलाच्या आतील व बाहेरील आवरणामध्ये ज्या मधमाश्यांच्या जाळ्यासारख्या पेशी असतात, त्यात अर्धप्रवाही घट्ट व चिकट द्रावण असते, त्यालाच काजू टरफल तेल म्हणतात. काजू टरफलाचे तेल हे काळ्या रंगाचे, घट्ट डांबरासारखे दिसते.
काजू टरफल तेलाचा लॅमिनेटिंग कागद, ऍक्टिवेटेड कार्बन, ब्रेक लायनिंग, रंग, रेक्झिन, रबर संयुगे इत्यादी उद्योगधंद्यांत मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याव्यतिरिक्त इमारती लाकूड, होड्या, जहाजे इत्यादींना लावण्यासाठी वापर करतात. तेलामुळे लाकडाचे पाणी आणि कीटक, किडी इत्यादींपासून संरक्षण होते.
काजू टरफल तेलापासून अनेक पदार्थ तयार करता येतात. कॉरडॅनॉल हा काजू बी टरफलाचा महत्त्वाचा घटक आहे. कॉरडॅनॉलचा उपयोग पृष्ठभागावर थर देण्यासाठी, विद्युतरोधक वॉर्निश आणि लाकडी सामानाला कोटिंग देण्यासाठी होतो.
काजू टरफल तेल ऊर्ध्वपतनानंतर गाळाचा उपयोग हवेवर सुकणारे वॉर्निश, सायकलचे कोटिंग, प्रायमर (रंगाच्या आधी) इ. तयार करण्यासाठी होतो. ब्रेक लायनरमध्ये टरफल तेलाचा उपयोग करतात, तर त्याच्या उपपदार्थांचा उपयोग यंत्राचे तेल, कीडनाशक, औषधी द्रव्य इत्यादीमध्ये करतात.
संपर्क : 02358 – 282414 कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली
उसापासून पॅकेजिंग
उसापासून पॅकेजिंग
सर्व प्रकारच्या उत्पादनविक्रीसाठी पॅकेजिंग ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. पॅकेजिंगमधून त्या उत्पादनाच्या वैशिष्ट्याला उठाव आणण्याचे काम केले जाते. सेंद्रिय उत्पादनासाठी नैसर्गिक व सेंद्रिय पॅकेजिंग आवश्यक मानले जाते. तसा आग्रहही आता जागरूक ग्राहक आणि सुपर मार्केट धरत आहेत. नेदरलॅंड येथील सेंद्रिय उत्पादक कंपनीने आपल्या पुरवठादारासह उसाच्या टाकाऊ घटकापासून पॅकेजिंग विकसित केले आहे. नेचर अँड मोअर ही कंपनी सेंद्रिय भाजीपाला आणि फळांच्या उत्पादन आणि विक्रीमध्ये प्रसिद्ध आहे. सेंद्रिय शेतीमालाच्या विक्रीसाठी सेंद्रिय पद्धतीच्या पॅकेजिंगसाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यांनी फळांच्या पॅकेजिंगसाठी उसाच्या टाकाऊ घटकापासून बनविलेल्या कार्डबोर्डचा वापर केला आहे. याविषयी माहिती देताना कंपनीचे पॅकेजिंग तज्ज्ञ पॉल हेन्ड्रिक्स यांनी सांगितले, की गेल्या दोन वर्षांपासून नवीन प्रकारचे पॅकेजिंग विकसित करण्यासाठी पुरवठादारांसह प्रयत्न केले आहेत. त्यातून उसाच्या टाकाऊ घटकांचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात पॅकेजिंगनिर्मिती करण्यात येत आहे. या पॅकेजिंगचा उपयोग सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या वेली टोमॅटो, पिअर विक्रीसाठी केला जातो.
सुपर मार्केटही वळताहेत प्लॅस्टिकमुक्त पॅकेजिंगकडे
विघटन होणारे, पुनर्वापर करणे शक्य असलेल्या प्लॅस्टिकमुक्त व पर्यावरणपूरक पॅकेजिंगच्या वापराकडे सुपर मार्केट वळत आहेत. नेचर अँड मोअरच्या सेंद्रिय उत्पादनांचा प्रमुख खरेदीदार असलेल्या फ्रेंच चेन चारेफोर या सुपर मार्केट व्यवस्थापक ज्यूली मेहमोन म्हणाल्या, की आम्ही आमच्या पुरवठादारांकडून पॅकेजिंगसह अनेक बाबींमध्ये पुनर्वापरायोग्य अशा घटकांच्या वापराला प्रोत्साहन देत असतो. त्यातून कचरा विल्हेवाटीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. तसेच उसासारख्या घटकापासून पॅकेजिंग ही चांगली कल्पना आहे. त्याचा वापर अन्य पुरवठादारही करतील, अशी आशा आहे.
हे फायदे आहेत
प्लॅस्टिकचा वापर टाळला आहे.
टाकाऊ घटकांचा पुरेपूर वापर
कागदाच्या निर्मितीसाठी झाडांची तोड करावी लागणार नाही.
सध्या कंपनी जुन्या पद्धतीच्या ट्रे, टॅग आणि लेबल, स्टिकर यामध्येही बदल करीत आहे. उसापासून पॅकेजिंग हे स्वच्छ, नैसर्गिक आणि सेंद्रिय उत्पादनासाठी योग्य आहे. तसेच वापरानंतर विल्हेवाट लावण्यामध्येही सोपे आहे. अगदी ते जाळले तरी पर्यावरणामध्ये प्लॅस्टिकप्रमाणे विषारी वायू निर्माण होत नाहीत.
आवळा कॅन्डी
आवळा कॅन्डी
आवळा कॅन्डी करताना पूर्ण पिकलेली मोठी किंवा मध्यम आकाराची रसदार फळे निवडावी. फळांना प्रथम उकळत्या पाण्याची प्रकिया ८ ते १० मिनिटे देऊन त्यामधील बिया आणि काप वेगळे करावेत. अर्धवट शिजलेल्या फळांवर बोटाचा दाब दिल्यावर पाकळ्या बियापासून सहजपणे वेगळ्या करता येतात. वेगळे केलेले काप प्रथम ५० डिग्री ब्रिक्स असलेल्या साखरेच्या पाकात २४ तास ठेवावेत. त्यासाठी १ लिटर पाण्यात १ किलो साखर मिसळावी. दुसऱ्या दिवशी पाकातील ब्रिक्सचे प्रमाण साधारणपणे २५ ते ३० एवढे कमी होते. त्यामध्ये ३५० ते ४०० ग्राम साखर मिसळून त्याचा ब्रिक्स ६० करावा. तिसऱ्या दिवशी त्याच पाकात ५०० ते ६०० ग्राम साखर मिसळून ब्रिक्स ७० डिग्री कायम ठेवावा. पाचव्या दिवशी त्याच पाकात १५० ते २०० ग्राम साखर घालावी आणि सातव्या किंवा आठव्या दिवशी पाकात मुरलेल्या पाकळ्या बाहेर काढाव्यात. पाकात पहील्यांदाच २% आल्याचा रस किवा विलायची पूड मिसळल्यास चव चांगली येते. कॅन्डी तयार झाल्यावर पाण्यात झटपट धुवून घ्यावी किंवा कापडाने पुसून घ्यावी आणि ३ ते ४ दिवस सुकवून घ्यावी. सुकलेली कॅन्डी प्लास्टिक पिशवीत भरून हवा बंद करावी.
(स्रोत: कृषी दर्शनी, महत्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ज्वारीवर आधारित प्रक्रिया पदार्थ
ज्वारीवर आधारित प्रक्रिया पदार्थ
ज्वारीचा उपयोग प्रामुख्याने भाकरीसाठी होतो. दक्षिण भारतामध्ये ज्वारीती संकटी, अन्नाम/ घुगऱ्या आणि पातळ पोरजी करण्यासाठी होतो. याशिवाय पारंपरिक पद्धतीने लाह्या, पापड्या, भातवाड्या व हुरड्यासाठी सुद्धा ज्वारीचा उपयोग केला जातो.
ज्वारीच्या लाह्या
मक्याप्रमाणेच ज्वारीपासून उत्तम प्रकारच्या लाह्या तयार होऊ शकतात. त्यासाठी राजहंस, कोंडवा, झिलारी या स्थानिक वाणांचा वापर केला जातो. राहुरी कृषी विद्यापीठाने यासाठी फुले पंचमी हे वाण प्रसारित केले आहे. परभणी मोती या वाणापासूनसुद्धा मोठ्या आकाराच्या आणि चविष्ट लाह्या तयार करता येतात.
पापडासाठी ज्वारी
पांढरी चिकनी आणि तांबडी चिकनी या जातीपासून उत्कृष्ट प्रकारचे पापड व कुरडई तयार करता येतात.
हुरडा
पेरणीनंतर ९०-९५ दिवसांनी दुधाळ अवस्थेत हुरडा तयार होतो. खरीप हंगामात वाणी, अकोला अश्विनी तर रब्बी हंगामात गुळभेंडी, सुरती या स्थानिक वाणांचा हुरड्यासाठी वापर होतो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून येथून एस.जी. एस. ८४ तर राहुरी विद्यापीठातून उत्तरा हे वाण हुरड्यासाठी प्रसारित करण्यात आले आहेत. या वाणांच्या गोंडातून दाणे सहज पडतात. सरासरी एका कणसापासून ७०-९० ग्रॅम गोड हुरडा मिळतो. शिवाय ताटेही गोड असल्याने (ब्रिक्स १५-१७) जनावरे कडबा चवीने खातात.
ज्वारीचा रवा
ज्वारीच्या दाण्यांना पॉलिश केले असता त्यापासून विविध ग्रेडचा रवा तयार करता येतो. ज्वारीला पॉलिश/ परलिंग केल्याने कोंड्यामधील कडवट घटक पदार्थ निघून जातात. अशा प्रकारे तयार करण्यात आलेल्या रव्याची प्रत आणि चव उत्कृष्ट असते. यापासून उपमा, दोसा, इडली, शेवया, शिरा, लाडू, असे विविध पदार्थ बनवता येतात.
ज्वारीपासून तयार केलेल्या जाड रव्याची साठवण क्षमता प्लास्टिकच्या बॅगमध्ये सर्वसाधारण ४५ दिवस तर बारीक रव्याची ३० दिवसापर्यंत आहे. संकरित वाण एसपीएच १४४९, सी एस व्ही १४ आर आणि परभणी ज्योती या वाणापासून उत्कृष्ट प्रतीचा रवा तयार होतो.
ज्वारीपासून मिश्र आट्याची निर्मिती
राष्ट्रीय ज्वारी संशोधन संचालनालय, हैदराबाद यांच्या मार्फत ५०-६० टक्के ज्वारी, गहू, तांदूळ, मका, रागी, बाजरी व सोयाबीन यांचा समावेश करून मिश्र आट्याची निर्मिती झाली आहे. त्यापासून उत्कृष्ट प्रतीची व चवीची भाकरी/ धपाटे तयार करता येतात. तसेच प्रथिनांची उपलब्धता वाढल्यामुळे पौष्टिकता सुद्धा वाढविली जाते.
माल्टप्रक्रिया
ज्वारीला मोड आणून पीठ केल्यास त्यातील प्रथिनाची प्रत सुधारते. मुक्त अमिनो ऑसिड्स वाढतात. साखर वाढते, प्रथिनाची, स्टार्चची पचनक्षमता सुधारते. ज्वारीच्या माल्टयुक्त पिठात सोयाबीन आणि नाचणीचे माल्टयुक्त पीठ मिसळून पॉलिप्रोपीलीनच्या पिशव्यात भरून हवाबंद करून ठेवल्यास सहा महिने टिकते.
अशा पिठाची भाकरी मधुमेही रुग्णासाठी फायद्याची आहे. या पिठापासून थालीपीठ, पराठे, भाकरी, सुप इ. पदार्थ तयार करता येतात. शिवाय अस पीठ रुग्णाला त्वरीत ऊर्जा, प्रथिने खनिज द्रव्य जीवनसत्त्व मिळवून देतात. या १०० ग्रॅम पिठापासून १५ टक्के प्रथिने, ६.५ टक्के तंतूमय घटक ३.८ टक्के उष्मांक, ४३५ किलो कॅलरीज मिळतात.
ज्वारीची बिस्किटे
ज्वारीच्या माल्ट पिठात नाचणी, सोयाबिनचे माल्ट पीठ, मिल्क पावडर घालून साखर विरहित क्रिमसह, प्रथिनयुक्त, उच्च तंतुमय आणि कमी कॅलरीज असणारी उत्तम प्रतीची बिस्किटे तयार करता येतील.
ज्वारीचे पोहे
ज्वारीच्या दाण्यावरील जाडसर थर (परलिंग) मशिनने काढून टाकून कुकरमध्ये उकडून घेताना त्यात थोडसं सायट्रिक आम्ल आणि मीठ घालतात. उकडल्यानंतर बाहेर काढून ते दाणे पोह्याच्या मशिनने चपटे करावेत. ड्रायरने चांगला कुरकुरीतपणा येईपर्यंत सुकवावेत. असे पातळ पोहे पॅकिंग करून विकावेत.
ज्वारीचा उकडा रवा
उकडा रवा तयार करण्यासाठी ज्वारी ऑटोक्लेव्हमध्ये उच्च दाबाखाली शिजवले जाते. नंतर ती सुकवून जाडसर दळली जाते चाळून रवा वेगळा करावा. हा रवा हवाबंद पॅक करून जास्त काळ टिकवता येतो. यापासून उपीट, उतप्पा, डोसा, इडली बनविता येते.
ज्वारीपासून मद्यार्क निर्मिती
काळ्या, खाण्यास अयोग्य अशा ज्वारीपासून आधुनिक तंत्राने मशिनच्या साह्याने ऊर्ध्वपातन पद्धतीने मद्यार्क निर्मिती करता येते. गोड ज्वारीपासूनही मद्यार्क निर्मिती करता येते.
इतर उपयोग
इतर अनेक उपयोगांसाठी ज्वारीचा वापर केला जातो. उदा. स्टार्च निर्मिती, पाव/ब्रेड बनवण्यासाठी, काकवी, गूळ, खांडसरी, साखर, बिअर व अल्कोहोलसुद्धा गोड ज्वारीपासून तयार करता येते. पशुखाद्य म्हणून जनावरे कोंबड्या, डुकरे यांच्यासाठीसुद्धा ज्वारी धान्याचा उपयेग केला जातो.
चाऱ्यासाठी ज्वारी ओल्या व वाळलेल्या कडब्यावर प्रक्रिया करून जनावरांसाठी सुद्धा उत्तम प्रतीचा चारा तयार करता येतो. ओल्या चाऱ्यापासून मुरघास (सायलेज), तर वाळलेल्या चाऱ्यापासून कडबाकुट्टी, कडबा बारीक करून त्याचे चौकोनी ठोकळे तयार करणे. तसेच ज्वारीच्या कडब्याबरोबर हरभरा, भुईमूग, तूर, उडीद, इ. भुसकटांचा वापर करून चविष्ट आणि अधिक पोषणमूल्य असलेला चारा जनावरांना मिळू शकतो.
क्षेत्र उत्पादन व उत्पादकता
शास्त्रीयदृष्ट्या ज्वारी हे सी-४ या वर्गातील पीक आहे. प्रकाश संश्लेषणाची क्रिया अतिशय कार्यक्षमतेने केली जाते.
ज्वारी हे पीक ग्रॅमिनी या वंशातील असून, त्याचे शास्त्रीय नाव ‘सोरगम बायकोलार’ असे आहे.
ज्वारीच्या कणसाचा आकार, दाटपणा व दाण्याचा आकार यावरून ज्वारीचे पाच प्रकार आढळतात. ते म्हणजे बायकोलार, गुनीया, कोडॅटम, काफिर आणि ड्युरा.
ज्वारीची प्रथम उत्पत्ती इथियोपिया या आफ्रिकन देशात झाली आहे. आफ्रिका खंडातील काही देश उदा. सुदान, कॅमेरून, खांडा इ. देशात ५० टक्के पेक्षा जास्त ज्वारीचे पीक घेतले जाते.
जगामध्ये अमेरिका, नायजेरिया, मेक्सिको, भारत, सुदान, अर्जेंटिना,
चीन, इथियोपिया, ऑस्ट्रेलिया, बक्रीना, फॅस्को आणि ब्राझील हे
ज्वारीचे प्रमुख उत्पादक देश आहेत. जागतिक स्तरावर ज्वारी हे गहू,
मका, भात व बार्ली यांच्यानंतर पाचव्या क्रमांकाचे प्रमुख अन्नधान्य पीक आहे.
इ.स. २०१०-२०११ मध्ये जगातील ११० देशात ४०.५ दशलक्ष हे. क्षेत्रावर ज्वारीचे पीक घेतले असून, ५५.६५ दशलक्ष टन एवढे उत्पादन मिळाले होते. भारत हा जगातील ज्वारी उत्पादक देशातील चौथ्या क्रमांकाचा देश असून एकूण उत्पादनाच्या १८ टक्के वाटा भारताचा आहे. (संदर्भ ः एफएओ)
भारतातील एकूण ज्वारीच्या क्षेत्र उत्पादनात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा
(४९ टक्के) आहे. महाराष्ट्रा खालोखाल कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेशव आंध्र प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो. परंतु, उत्पादकतेचा विचार करता मध्य प्रदेश (१४२६ किलो ग्रॅम/हे) त्या पाठोपाठ आंध्र प्रदेश (१२१३ कि.ग्रॅ./ हे), कर्नाटक (११८० कि.ग्रॅ./हे) या राज्यांचा क्रमांक लागतो.
ज्वारी इडल्या, चकल्या आणि केकही !
ज्वारीच्या मूल्यवर्धनासाठी शबरी फ्रेश ब्रॅंड
सोलापूर जिल्ह्याची ओळख असलेल्या ज्वारीचे मूल्यवर्धन करून उद्योजक तयार करण्यासाठी सोलापूर कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) पुढाकार घेतला आहे. केव्हीकेच्या नावाने ‘शबरी फ्रेश’ या नावाखाली खास ब्रॅंड तयार केला असून, ज्वारीच्या रव्याची विक्री सुरू केली आहे. ज्वारीचे अधिकाधिक मूल्यवर्धन व्हावे, हा हेतू त्यामागे आहे.
शेतमाल प्रक्रिया किंवा मूल्यवर्धन याबाबत केवळ मार्गदर्शन करण्यापेक्षा यासंबंधीचा प्रयोग स्वतः करावा, तो इतरांना दाखवावा आणि उद्योजक घडवावेत असा व्यापक दृष्टिकोन सोलापूर कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) ठेवला आहे. या संबंधीचे प्रशिक्षण महिला बचत गटांना देऊन उद्योजक घडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. शंभरहून अधिक महिलांना प्रशिक्षण दिले आहे.
आरोग्यासाठी पौष्टिक म्हणून ज्वारीची निवड
पौष्टिक म्हणून ज्वारी परिचित आहेच. त्यात विविध आरोग्यदायी गुणधर्म आहेत. अमेरिकेसारख्या देशातही ज्वारीला महत्त्व आले आहे. ज्वारीपासून रवा, पोहे, शेवया, लाह्या यासारख्या पदार्थांचे महत्त्व बाजारात वाढत आहे. ज्वारीच्या पिठात सोयाबीनचे पीठ मिसळून त्यातील प्रथिनांचे प्रमाण १४ टक्क्यांपर्यंत वाढवता येते. ज्वारीसोबत गहू, मका, रागी, बाजरी, सोयाबीन अशा विविध अन्नधान्यांची पिठे मिसळून तयार करण्यात येणाऱ्या भाकरीची चव काही न्यारीच आहे.
महिला बचत गटांना प्रशिक्षण
ज्वारीचे हे महत्त्व कृषी विज्ञान केंद्राने जाणले आणि २०१० पासूनच ज्वारीच्या मूल्यवर्धनासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी मशिनरीसह कौशल्याची गरज होती. त्यासाठी प्रयत्न केले. ज्या महिला बचत गटांनी या कामासाठी तयारी दर्शवली, त्यांची मानसिक तयारी पूर्ण करून घेतली. तज्ज्ञांकडून बचत गटांतील महिलांमध्ये कौशल्य विकसित केले. आवश्यक प्रशिक्षण, कच्चा मालाचा पुरवठा, ब्रॅंडिंग, ट्रेडमार्क, मार्केटिंग यासारख्या तांत्रिक गोष्टीपासून विक्री व्यवस्थेपर्यंतचे सर्व प्रशिक्षण देण्यात आले.
ज्वारीच्या मूल्यवर्धनासाठी पाच प्रकारची यंत्रे आहेत. त्यावर वेगवेगळी कामे करता येतात. त्यात क्लिनिंग अँड ग्रेडिंग (ज्वारी स्वच्छ करणे), पल्वरायझर, डीहलर (ज्वारीचे पॉलिशिंग), पीठ, रवा, भुसा वेगळे करणे (फ्लोअर शिफ्टर) आणि त्यानंतर ज्वारीच्या पदार्थांचे पॅकिंग आदीं विविध कामांसाठी ही यंत्रे उपयोगात आणली जातात.
ज्वारी व अन्य तृणधान्यातील पोषक घटकांचे प्रमाण
तृणधान्य
ज्वारी
रागी
मका
बाजरी
तांदूळ
गहू
प्रथिने (टक्के)
11.6
7.3
1.1
11.6
6.8
12.1
स्निग्ध पदार्थ (टक्के)
1.9
1.3
3.6
5.0
0.5
1.7
खनिज पदार्थ (टक्के)
1.6
2.7
1.5
2.3
0.6
2.7
तंतूमय पदार्थ (टक्के)
1.6
3.6
2.7
1.2
0.2
1.9
पचणारे तंतूमय पदार्थ (मि.ग्रॅ/ग्रॅ.)
12.69
19.08
—-
—-
—-
11.40
पिष्टमय पदार्थ (टक्के)
72.6
72.0
66.2
67.5
78.2
69.4
ऊर्जा (मि.ग्रॅ./ 100 ग्रॅम)
349
328
342
361
345
341
कॅल्शियम (मि.ग्रॅ/ 100 ग्र्रॅम)
25
344
10
42
10
48
फॉस्फरस (मि.ग्रॅ/ 100ग्रॅम)
222
286
348
296
160
355
लोह(मि.ग्रॅ/100ग्रॅम)
4.1
3.9
2.3
80
0.7
4.9
लेखक : डॉ. हि. वि. काळपांडे, ०२४५२-२२११४८(लेखक ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक)
मशरूम लागवड प्रक्रिया
मशरूम लागवड प्रक्रिया
काड भिजवणे
प्रथम काड लांब असल्यास त्याचे ३-५ सें.मी. चे तुकडे करावेत. नंतर थंड पाण्यात १०-१२ तास भिजवावे. भिजलेले काड बाहेर काढून निर्जंतुक करावे. निर्जन्तुकीकरणा करिता गरम पाण्यात १ तास ठेवावे.
निर्जंतुकीकरण
निर्जंतुकीकरणा करिता २०० लि. क्षमता असणारा गंज नसणारा ड्रम घ्यावा. त्यात १०० लि.पाणी टाकावे व ते ८० ते ८५ अंश सेल्सियस तापमानापर्यंत गरम करावे व त्यात भिजवलेले काड १ तास ठेवावे. त्यानंतर २ तास निर्जंतुक केलेले काड निथळण्याकरिता ठेवावे.
आळिंबी लागवड प्रक्रिया
काड भिजवणे → १२ ते १५ तास → गरम पाण्यात निर्जंतुक करणे
↓ १ तास
पिशव्यांमध्ये बी भरणे
↓
उबविणे
↓ १४ ते २० दिवस
पिशवी काढणे
↓ २-३ दिवस
१ ली काढणी
↓ ४-६ दिवस
२ री काढणी
↓ ५-६ दिवस
३ री काढणी
३. बी पेरणे
प्लास्टिकच्या पिशवीत काडाचा थर द्यावा. अंदाजे दोन ते अडीच इंच. नंतर त्यावर पिशवीच्या कडेने बी पेरावे. बीच्या थरावर पुन्हा काडाचा थर द्यावा. पुन्हा बी चा ठार, असे करून पिशवी भरावी.
बी पेरताना ओल्या काडाच्या २% प्रमाणात पेरावे. पिशवी भरताना काड दाबून भरावे. पिशवी भरल्यावर दोर्याच्या सहाय्याने तोंड बांधावे व पिशवीला २५-३० छिद्रे मारावीत. छिद्रे पाडताना दाभान किंवा गंज नसलेल्या सुईचा वापर करावा.
उबविणे
बुरशीच्या वाढीकरिता उबविने ही महत्वाची क्रिया आहे. बी पेरून बांधलेल्या पिशव्या निर्जंतुक खोलीत ठेवाव्यात. खोलीत अंधार ठेवावा व तापमान २२ ते २६ अंश सेल्सियस ठेवावे.
पिशवी काढणे
पिशवीमध्ये बुरशीची पूर्ण वाढ झाल्यावर ती पांढरी दिसते. ती ब्लेडने कापून काढावी व रॅकवर ठेवावी. तापमान २० ते ३० अंश सेल्सियस व आद्रता ७०-८५% राहील याची दक्षता घ्यावी. खोलीमध्ये अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश (संधीप्रकाश) व हवा खेळती ठेवावी. पिशवीतून काढलेल्या बेडवर एक दिवसानंतर पाण्याची हळुवार फवारणी करावी. दिवसातून ३-४ वेळा पाण्याची फवारणी करावी. फवारणी करण्याकरिता पाठीवरचा स्प्रे पंप किंवा हॅन्ड स्प्रेचा वापर करावा.
काढणी
मशरूमची पूर्ण वाढ पिशवी फाडल्यानंतर ४-५ दिवसांत होते. वाढ झालेले मशरूम हाताने उजवीकडे किंवा डावीकडे वळवून काढावेत. मशरूम काढल्यानंतर बेड एक ते दीड इंच खरडावा व पाणी द्यावे. १० दिवसांनी दुसरे पीक, परत १० दिवसांनी तिसरे अशी तीन पिके मिळतात.
एका बेड (पिशवी) पासून ९०० ते १५०० ग्रॅम पर्यंत ओली आळिंबी मिळते. शिल्लक राहिलेल्या बेडचा वापर झाडांना खत, जनावरांना पौष्टिक चारा म्हणून करण्यात येतो.
साठवण
ताज्या आळिंबीची (मशरूमची) साठवण छिद्रे पाडलेल्या २००-३०० गेजच्या प्लास्टिक पिशवीत करतात. ४-५ दिवस फ्रीजमध्ये मशरूम उत्तम राहते. मशरूम उन्हात दोन दिवसात उत्तम वळते. मशरूम वाळवण्याकरिता ४५-५० अंश सेल्सियस तापमान योग्य ठरते. वाळविलेले मशरूम सीलबंद पिशवीत भरून ठेवावे.
योग्य व्यवस्थापन यशाची गुरुकिल्ली
मशरूम उत्पादन येण्याकरिता महत्वाच्या बाबी :
१. मशरूम उत्पादन परिसर स्वच्छ ठेवावा.
२. मशरूमचे उत्पादन बंदिस्त जागेतच घ्यावे.
३. मशरूमच्या खोलीत खेळती हवा राहील, याची काळजी घ्यावी.
४. खोलीतील तापमान ३० अंश सेल्सियस व आद्रता ८०% राहील याची काळजी घ्यावी.
५. आळिंबी लागवड करणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता पाळावी. स्वच्छ कपडे, चप्पल यांचा वापर करावा.
६. नवीन व स्वच्छ कोरडा कच्चा माल वापरावा.
७. काडाचे निर्जंतुकीकरण महत्वाची प्रक्रिया आहे. ती योग्य करावी.
८. सूर्यप्रकाश प्रत्यक्ष येऊ देऊ नये. संधीप्रकाश बॅग उघडल्यावरच भरपूर ठेवावा.
९. मशरूम बेडवर फवारण्याचे पाणी स्वच्छ असावे.
१०. पिशव्या भरण्यापूर्वी काड फार ओले नसावे. हाताने दाबून पाहावे. पाणी न निघाल्यास भरण्यास योग्य आहे, असे समजावे.
११. पिशव्या ठेवताना दोन पिशव्यातील अंतर १० इंच ठेवावे.
१२ .रोग, किडीचा, चिलटांचा प्रादुर्भाव झाल्यास नुवान ( १ मि.मि., १ लिटर पाण्यात मिसळून फवारावे.)
१४. भरलेल्या बेड (पिशव्या) मध्ये कीडी, रोगांचा प्रादुर्भाव झाला तर नाही ना, या करिता दर रोज निरीक्षण करावे.
१५. मशरूमची काढणी वेळेत करावी. योग्य पद्धतीने वर्गीकरण करावे. उन्हात किंवा ड्रायरमध्ये आळिंबी सुकवून सीलबंद पाकिटात साठवण करावी.
अशा पद्धतीने काळजी घेतल्यास आपण यशस्वी उत्पादन घेऊ शकतो.
बोरापासून रस, सरबत, स्क्वॅश
बोरापासून रस, सरबत, स्क्वॅश
बोरापासून घरच्या घरी रस, सरबत, स्क्वॅश तयार करता येतो. उमराण, गोला, ऍपल बोर, कडाका या बोरांपासून टुटीफ्रुटी तयार करावी.
रस
1) खाण्यायोग्य असलेली पिवळसर रंगाची पिकलेली व निरोगी बोरे निवडून घ्यावीत. किडकी बोरे निवडून काढण्यासाठी बोरे पाण्यात टाकल्यास किडकी बोरे पाण्यावर तरंगतात, तर चांगली बोरे पाण्यात बुडतात. 2) पाण्यात बुडालेली बोरे स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर बोरातील बी कॉर्क बोररच्या साह्याने काढून गरांचे बारीक तुकडे करून ते मिक्सरमधून लगदा तयार करावा किंवा पल्परला लावून गर एकजीव करून घ्यावा. 3) या लगद्यात 0.50 ते 1 टक्का पेक्टिनेज थ्री एक्सएल किंवा ट्रायझाइम पी-50 हे एंझाइम मिसळून रस थोडा वेळ तसाच ठेवावा. यामुळे रसाची रिकव्हरी 45-55 टक्क्यांपर्यंत मिळते. 4) हायड्रॉलिक बास्केट प्रेसच्या साह्याने त्या लगद्यातून रस काढावा. हा रस पाश्चराईझ करून, परिरक्षकाचा वापर करून, निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून, बाटल्या हवाबंद करून वर्षभर साठवून ठेवता येतो. हा रस पुढील पेये तयार करण्यासाठी वापरता येतो.
सरबत, स्क्वॅश, सिरप
1) सरबत तयार करताना वरीलप्रमाणे काढलेला रस 10 टक्के, रसामधील साखर ग्रहित धरून उरलेली साखर टाकून त्याचा ब्रिक्स 15 अंश, सायट्रिक आम्ल मिसळून आम्लता 0.30 टक्के करावी. उरलेले पाणी वापरून सरबत तयार करावे. 2) स्क्वॅश करताना रस 25-30 टक्के घ्यावा. रसामधील साखर व आम्लता ग्रहित धरून बाकीची साखर व सायट्रिक आम्ल टाकून अनुक्रमे त्याचा ब्रिक्स 45 अंश व आम्लता 1.50 टक्के करावी. तयार झालेला स्क्वॅश निर्जंतुक केलेल्या बाटल्यांत भरावा. स्क्वॅश वापरताना एक ग्लास स्क्वॅशमध्ये दोन किंवा तीन ग्लास थंड पाणी घालून त्याचा आस्वाद घ्यावा. 3) सिरप करण्यासाठी रस 40 टक्के घ्यावा. रसामधील साखर ग्रहित धरून उरलेली साखर व सायट्रिक आम्ल टाकून त्याचा अनुक्रमे ब्रिक्स 65-68 अंश, आम्लता 1.5 ते 2 टक्के व उरलेले पाणी टाकून सिरप बनवावा. स्क्वॅश व सिरपमध्ये सोडियम बेन्झोएट 600 मिलिग्रॅम प्रति किलो पेय या प्रमाणात वापरावे. सिरपचा आस्वाद घेताना एक ग्लास सिरपमध्ये चार-पाच ग्लास थंड पाणी मिसळावे.
बोराची टुटीफ्रुटी
1) बोरापासून टुटीफ्रुटी तयार करण्यासाठी उमराण, गोला, ऍपल बोर, कडाका इत्यादीसारख्या आकाराने मोठ्या असणाऱ्या जाती वापराव्यात. 2) टुटीफ्रुटी तयार करण्यासाठी पिवळसर रंगाची बोरे निवडून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत व त्यांची साल स्क्रॅपरच्या किंवा पिलरच्या साह्याने काढावी. नंतर त्यातील बी कॉर्क बोररच्या साह्याने काढून टाकून सुरीने त्यांचे चौकोनी लहान तुकडे करून उकळत्या पाण्यात 3 मिनिटे धरावेत. नंतर ते तुकडे एक टक्का सायट्रिक आम्ल असलेल्या 50 अंश ब्रिक्सच्या पाकात 24 तास ठेवावेत. गरज भासल्यास खाद्य रंग वापरावा. 3) दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी पाकाचा ब्रिक्सवर कॅंडीमध्ये दिल्याप्रमाणे करावा. तुकडे पूर्णपणे पाकवल्यानंतर पाकातून काढून, वाहत्या पाण्यात धुऊन घ्यावेत. सावलीत सुकवून, वजन करून, प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवावेत. 4) बोरापासून तयार केलेल्या टुटीफ्रुटीचा उपयोग विविध प्रकारचे केक, फ्रूट ब्रेड, फ्रूट सॅलड, आइस्क्रीममध्ये करता येतो.
जॅम
1) चांगली पिकलेली निरोगी फळे निवडून वाहत्या स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यावीत. नंतर फळांतील बी कॉर्क बोररच्या साह्याने काढून त्यांचे लहान लहान तुकडे करावेत. 2) या तुकड्यांच्या वजनाएवढे पाणी टाकून शिजवून घ्यावे व तो लगदा थंड थालेवर एक मिलिमीटरची छिद्रे असलेल्या चाळणीतून काढून घ्यावा. या एकजीव केलेल्या 1 किलो गरामध्ये 1 लिटर पाणी, 750 ग्रॅम साखर व 8-10 ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून ते मिश्रण शेगडीवर गरम करावे. 3) मिश्रणाचा ब्रिक्स 65 ते 68 अंश ब्रिक्स आला किंवा ते मिश्रण तुकड्यात पडू लागले म्हणजे जॅम तयार झाला असे समजावे. तयार झालेला जाम गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून, बाटल्या थंड झाल्यावर मेणाचा थर देऊन किंवा ऍल्युमिनियम फॉइल लावून, लेबल लावून, बाटल्या थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.
फणसापासून मुरांबा, जॅम
फणसापासून मुरांबा, जॅम
फणसातील महत्त्वाचा खाद्य भाग म्हणजे पिकलेले गरे. हे गरे रुचकर, मधुर व गोड असतात. त्यात “अ’ आणि “क’ जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. पिकलेल्या फणस गरांपासून जेली, जॅम, सरबत, मुरांबा, फणसपोळी, स्क्वॅश, नेक्टर इ. पदार्थ बनवितात. फणसापासून वेफर्स, चिवडासुद्धा बनविले जातात. कोवळ्या (कच्च्या) फणसाचा उपयोग भाजीसाठी केला जातो. फणसाचे फळ पोषणदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत आहे. फळातील महत्त्वाचा खाद्य भाग म्हणजे पिकलेले
गरे
गरे रुचकर, मधुर व गोड असतात. त्यात “अ’ आणि “क’ जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. फणसाच्या बियासुद्धा खाद्य म्हणून वापरतात. बियांमध्ये कर्बोदकांचे / पिष्टमय पदार्थांचे प्रमाण मुबलक आहे. बी खाण्यासाठी वापरताना भाजून किंवा उकडून खाण्यासाठी वापरतात. बिया ओल्या असताना त्याची चिरून भाजी करतात. सुकवलेल्या अठळ्या डब्यामध्ये साठविता येतात. सुकलेल्या बिया पाहिजे त्या वेळेस भाजून वा मिठाच्या पाण्यात उकडून खातात. भाजलेल्या बियांची भाजी करण्याचीही पद्धत आहे. पिकलेल्या फणस गरांपासून जेली, जॅम, सरबत, मुरांबा, फणसपोळी, स्क्वॅश, नेक्टर इ. पदार्थ बनवितात. फणसापासून वेफर्स, चिवडासुद्धा बनविले जातात. कोवळ्या (कच्च्या) फणसाचा उपयोग भाजीसाठी केला जातो. अशा प्रकारच्या फणसापासून लोणचेदेखील चांगले होते. फणसाच्या लाकडाचा उपयोग इमारतीसाठी वापरला जातो. फणसाचे गरे व बिया सोडून राहिलेला भाग जनावरांना खाद्य म्हणून उपयोगात आणला जातो.
गऱ्यांचा मुरांबा
पाण्यामध्ये एक टक्का सायट्रिक आम्ल टाकून एकत्र करून त्यामध्ये कापा फणसाचे गरे 20-25 मिनिटे बुडवून ठेवावेत. हे गरे जसेच्या तसे किंवा तीन-चार तुकडे करून घ्यावेत. एका भांड्यामध्ये पाणी घेऊन उकळायला ठेवावे. पाण्याला उकळी आली, की त्यामध्ये सायट्रिक आम्लाच्या पाण्यातील गरे काढून गाळा. एक उकळी आली, की गॅस बंद करून, भांड्यावर झाकण ठेवून, दहा मिनिटे तसेच स्टेनलेस स्टीलच्या चाळणीत वरील गरे व पाणी टाकून, गरे निथळून घ्यावेत. नंतर साखरेचा 65 अंश ब्रिक्सचा पाक करून त्यामध्ये 0.8 टक्का सायट्रिक आम्ल टाकावे. द्रावणाला चांगली उकळी आल्यानंतर द्रावण शेगडीवरून उतरून त्यामध्ये वरील निथळलेले गरे टाकावेत व शेवटी 0.05 टक्का पोटॅशिअम मेटाबायसल्फाईट टाकून वरील मिश्रण निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या बरणीत भरून हवाबंद करावे. बरणी थंड व कोरड्या जागी साठवावी.
गऱ्यांचा जॅम
पिकलेल्या फणसाच्या गऱ्यांमधील बिया (आठळ्या) काढून, त्याचे तुकडे करावेत. त्या तुकड्यांमध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्सरच्या किंवा पल्पच्या साह्याने लगदा करून घ्यावा व जॅम बनविण्यासाठी खालीलप्रमाणे साहित्य वापरावे.साहित्य – प्रमाण गर लगदा – एक किलो साखर – 1.250 किलो सायट्रिक आम्ल – दहा ग्रॅम पोटॅशिअम मेटाबायसल्फाइट – एक ग्रॅम
गऱ्यांचा लगदा व साखर स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात एकत्र करून शिजविण्यासाठी शेगडीवर ठेवावे. मिश्रण घट्ट होत आल्यानंतर, दोन वेगवेगळ्या काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये सायट्रिक आम्ल व पोटॅशिअम मेटाबायसल्फाईट विरघळून वरील मिश्रणात टाकावे. मिश्रण शिजत असताना सतत ढवळावे. जेणेकरून भांड्याला लागणार नाही किंवा करपणार नाही. मिश्रणातील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण 68.5 अंश ब्रिक्सच्या वर गेल्यावर जॅम तयार झाला असे समजावे किंवा मिश्रण तुकड्यात पडू लागले म्हणजे जॅम तयार झाला असे समजावे. तयार झालेला जॅम रुंद तोंडाच्या निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीमध्ये भरून, हवाबंद करून, कोरड्या व थंड जागी साठवावा.
गऱ्यांची जेली
फणसाच्या गऱ्यांमध्ये पेक्टीनचे प्रमाण चांगले असल्याने त्यापासून उत्तम जेली तयार होते. गऱ्यांमधील आठळ्या बाजूला करून, गऱ्यांचे बारीक तुकडे करावेत. जेली करताना गऱ्यांबरोबर सालीचा पांढरा भाग घेतल्यास उत्तम जेली होते. एक किलो तुकड्यासाठी सव्वा ते दीड लिटर पाणी टाकावे. मिश्रण 30 मिनिटे शिजवावे. मिश्रण शिजत असताना पळीने सतत ढवळावे. थंड झाल्यावर हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घेऊन उभट भांड्यात एक दिवस फ्रीजमध्ये ठेवावे. उभट भांड्यातील पारदर्शक रस वेगळा करावा. अशाप्रकारे वेगळ्या केलेल्या रसामध्ये (एक किलो रसासाठी) एक किलो साखर घालून, मिश्रण ढवळून गरम करण्यास ठेवावे. मिश्रण बऱ्यापैकी घट्ट होत आल्यानंतर त्यामध्ये दोन वेगवेगळ्या ग्लासमध्ये वरील पारदर्शक रस घेऊन सहा ग्रॅम सायट्रिक आम्ल व एक ग्रॅम पोटॅशिअम मेटाबायसल्फाईट विरघळून वरील मिश्रणात टाकावे. मिश्रणातील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण 67 अंश ब्रिक्सच्या वर गेल्यावर किंवा मिश्रण तुकड्यात पडू लागले किंवा गोळीबंद पाकाची परीक्षा घेऊन जेली तयार झाल्याची खात्री करावी. तयार झालेली जेली निर्जंतुक केलेल्या बाटलीमध्ये भरून हवाबंद करून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवावी.
फणस पोळी
पोळी तयार करण्यासाठी गऱ्यांमधील बिया काढाव्यात. गऱ्यांतील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण साखर टाकून 23 ते 25 अंश ब्रिक्स करावे. मिक्सरमध्ये गरे व साखर एकजीव करून घ्यावे. एकजीव केलेले मिश्रण, तुपाचा हात लावलेल्या पसरट स्टीलच्या ताटात पातळ पसरावे. उन्हामध्ये वाळविण्यास किंवा वाळवणी यंत्रामध्ये 55 ते 60 अंश तापमानास वाळवावे. गराचा एक थर वाळल्यानंतर दुसरा थर द्यावा. असे थरावर थर देऊन जाडी 1.5 सें.मी. झाली की बटर किंवा ऍल्युमिनिअम फॉईलच्या पेपरमध्ये गुंडाळून रुंद तोंडाच्या बरणीत भरून साठवितात.: 02426- 243247, प्रा. कड, उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
औषधी गुणधर्म
फणस रुचकर, मधुर व गोड असतो. फणस खाण्याने तृप्ती होते. फणस शुक्रधातू वाढविण्यास मदत करतो. ताकद वाढविण्यास हितकारक. वजन वाढविण्यास मदत करतो. रक्तपित्त रोगावर हितकारक. फणस गराचे अतिप्रमाणात सेवन केल्याने छाती-पोटात दाह होऊ शकतो.कच्चा फणस खाल्ल्याने मलप्रवृत्ती कडक होऊ शकते व वातदोषही वाढू शकतो. तेव्हा फणस पिकला की मगच खाणे हितकारक आहे. फणसाच्या बियांमुळे मलप्रवृत्ती कडक होऊ शकते. तेव्हा मलावरोधाची प्रवृत्ती असणाऱ्यांनी फार प्रमाणात बियांचे सेवन करू नये.
कच्च्या फणसाचे पदार्थ
वेफर्स
पूर्ण परिपक्व झालेले, परंतु कच्चे फणस निवडून धारदार सुरीच्या साह्याने कापून गरे काढावेत. सुरी किंवा विळीच्या साह्याने गऱ्याचे तीन ते चार मि.मी. रुंदीचे तुकडे बिया बाजूला करून करावेत. तेल कढईमध्ये घेऊन गरम करण्यास ठेवावे. तेल व्यवस्थित गरम झाल्याची खात्री झाल्यानंतर गरे व्यवस्थित तळून घ्यावेत. असे तळून काढलेले गरे जाळीवर काही काळ ठेवावेत, जेणेकरून अतिरिक्त तेल पाझरून निघून जाईल. तळलेले गरे (वेफर्स) थंड झाल्यानंतर पॉलिथिनच्या पिशवीमध्ये भरून हवाबंद करावेत. काही वेळा ग्राहकांच्या पसंतीनुसार वेफर्स खारे करायचे असतील, तर वेफर्स कढईत घट्ट झाल्यानंतर थोडेसे बाजूला करून त्यावर मिठाचे संपृक्त म्हणजेच 7.5 टक्के तीव्रतेचे द्रावण शिंपडावे. याव्यतिरिक्त काही वेळा वेफर्सला किंचित मसाल्याचीही चव दिली जाते. बाजारातही साधे, खारे आणि तिखट अशा तीन प्रकारचे वेफर्स उपलब्ध असतात. याव्यतिरिक्त लोकांच्या आवडीनुसारही फणसाच्या वेफर्सला स्वाद देता येतो.
फणसाची पावडर
चिवडा करताना दुसऱ्या पद्धतीप्रमाणे फणसाच्या तुकड्यांना वाफवून किंवा गरम पाण्यात दोन-तीन मिनिटे बुडवून, जास्तीचे पाणी निचरा करून, वाळवणी यंत्रामध्ये किंवा सूर्यप्रकाशामध्ये वाळवितात. ज्या वेळेस तुकड्यांमधील पाण्याचे प्रमाण सात टक्क्यांपेक्षाही कमी होईल, त्या वेळेस दळणी यंत्रामध्ये दळून पावडर तयार केली जाते. अशा प्रकारे तयार झालेली पावडर (भुकटी) पॉलिथिनच्या पिशवीत भरून हवाबंद केली जाते.
फणसाचा चिवडा
फळाच्या गऱ्यांपासून उत्तम प्रतीचा चिवडा तयार करता येतो. यासाठी काप्या फणसाचा वापर केला जातो. प्रथम कच्चा फणस घेऊन त्याचे गरे काढले जातात. गऱ्यांपासून धारदार सुरीच्या साह्याने बिया वेगळ्या करून चार मि.मी. जाडीचे तुकडे/काप केले जातात. या कापांना/तुकड्यांना एक वाफ दिली जाते किंवा उकळत्या पाण्यात दोन-तीन मिनिटे धरले जाते. जास्तीचे पाणी निथळून देऊन तुकडे तळले जातात. तळत असताना त्यावर 7.5 टक्के मिठाचे संपृक्त द्रावण शिंपडावे. तुकडे व्यवस्थित तळल्यानंतर तेलातून बाहेर काढून त्यावर आवडीप्रमाणे चिवडा मसाला चोळावा. दुसऱ्या पद्धतीमध्ये वरीलप्रमाणे वाफवून घेतलेल्या तुकड्यांना वाळवणी यंत्रामध्ये 55 ते 60 अंश सेल्सिअस तापमानास सर्वसाधारणपणे वाळेपर्यंत (16-18 तासांपर्यंत) किंवा सूर्यप्रकाशामध्ये वाळवावेत. अशा प्रकारे वाळलेले तुकडे हवाबंद करून साठवावेत. आवश्यकतेनुसार तेलात तळून त्याला मीठ व चिवडा मसाला लावून खाण्यासाठी वापरावेत.
स्पिरुलीना (शेवाळ) प्रकल्प
स्पिरुलीना (शेवाळ) प्रकल्प
महिला बचत गटांसाठी एक सोपा उदयोग
स्पिरुलीना (शेवाळ ) प्रकल्प
महाराष्ट्रात सध्या उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. अहमदनगर जिल्ह्यात चावडीच्या माध्यमातून शेतकरयांशी ; महिला बचत गटांसोबत तसेच तरूणांबरोबर संवाद साधताना अशी मागणी आली की,एखादा असा व्यवसाय सुचवा ज्यामध्ये स्व:स्तातले बियाणे,खते कमी, कमी मजूर, किडीचा कमी प्रादुर्भाव आणि भरपूर उत्पादन आणि मुळात बाजारभाव चांगला मिळेल अणि मार्केट मिळणे सोपे असा प्रकल्प सांगा. जेव्हा या प्रश्नावर अभ्यास केला तेंव्हा एका आगळ्यावेगळ्या शेतीपूरक व्यवसायाची माहिती मिळाली. या व्यवसायाचे नाव आहे “ स्पिरुलीना प्रकल्प (हिरवे-निळे शेवाळ निर्मिती) “ हे शेवाळ हौदामध्ये तयार केले जाते.
१. जागा – १ ते २ गुंठे (हा प्रकल्प फक्त शेतावर करावा असे बंधन नाही अगदी शहरी भागात मोकळ्या प्लॉट मध्ये ; घराजवळील मोकळ्या जागेत हा प्रकल्प सूरू करता येईल)
२. उत्पादन खर्च – प्रति किलो १०००-१५०० रुपये
३. शेवाळाचा नक्की उपयोग – विविध आजारांवर प्रभावी औषध म्हणून वापरले जाते.शक्तिवर्धक आहे.नासाने यास सर्वोत्तम अन्न म्हणून घोषित केले आहे.
४. प्रकल्प उभारणीचा खर्च – १ ते १.५ लाख
५. मजूर,पाणी लागते का ? – पाणी सारखे लागत नाही. घरातील प्रशिक्षित व्यक्ती हे काम एकटेसुद्धा करू शकते
६. बाजारभाव – थेट स्वत विक्री केल्यास अंदाजे ५००० ते ६०००/- किलो
७. बाजारात कुठे विकले जाते? कंपन्या मार्केटमध्ये विकत घेण्यास तयार आहेत तसेच लोकल मार्केट मध्ये विक्री करणे शक्य आहे.
८. बँक कर्ज व शासकीय योजना – यास शासनातर्फे प्रयत्न केल्यास प्रोत्साहनपर अनुदान मिळू शकते तसेच पत पाहून बँक कर्ज उपलब्ध होऊ शकेल.
सुरवातीस ५० हजार ते १ लाख खर्च करून उद्योग सुरु केल्यास जास्त फायदा होईल.
महिला बचत गटाने एकञ येऊन आपल्या राहत्या घराच्या शेजारच्या मोकळ्या जागेत सुध्दा छोटा प्रकल्प सुरू करता येईल. सुशिषित बेरोजगार तरूणांसाठी हा उदयोग म्हणजे एक सर्वात मोठी संधी म्हणायला हरकत नाही.
हा व्यवसाय सुरू केल्यास
कमी भांडवल,कमी मनुष्यबळ,सोपे तंत्र,आणि भरपूर नफा असे या व्यवसायाचे सूत्र आहे. अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र , (पायरेन्स ) बाभळेश्वर, ता राहता जि अहमदनगर येथे संपर्क करावा
लेखक : अनिरुद्ध मिरीकर
सौरऊर्जेच्या मदतीने टोमॅटो पावडर बनवणारे तंत्र
सौरऊर्जेच्या मदतीने टोमॅटो पावडर बनवणारे तंत्र
दर कोसळतात त्या वेळी करा मूल्यवर्धन
टोमॅटोचे दर जेव्हा कोसळतात, त्या वेळी निराश होण्याची गरज नाही. त्यावर साधीसोपी प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करून त्याची पावडर तयार करा. बाजारपेठेत अशा तयार पदार्थांना मार्केट तयार करणे शक्य आहे, असे मत तज्ज्ञांनी मांडले आहे. अलीकडील काळात विविध शेतमालांच्या प्रक्रियेला महत्त्व आले आहे. उदाहरण घ्यायचे तर आल्याची वा लसणाची पेस्ट बाजारात तयार मिळू लागली आहे. सध्याच्या काळात शहरांमधील रहिवाशांना धकाधकीच्या जीवनातून वेळेची कमतरता जाणवते. साहजिकच ते अशा तयार पदार्थांना पसंती देतात. त्यामुळे काळाची व ग्राहकांची गरज लक्षात घेऊन अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरून तसा व्यवसाय करण्याची संधी आहे. टोमॅटोचे उदाहरण घेऊया. टोमॅटोची पावडर तयार करण्याचे तंत्रज्ञान आता उपलब्ध झाले आहे. टोमॅटोचे आहारात विशेष महत्त्व आहे. त्यामध्ये कॅलरीज कमी असतात, शिवाय अँटिऑक्सिडंट या महत्त्वाच्या आरोग्यदायी घटकाबरोबर तंतुमय पदार्थ (फायबर्स), खनिजे व जीवनसत्त्वे यांचा त्यात चांगला समावेश असतो. लायकोपीन या घटकाचे प्रमाणही त्यात भरपूर म्हणजे प्रति किलोमागे 60 ते 90 मिलिग्रॅमपर्यंत असते. ताज्या टोमॅटोमध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले म्हणजे शंभर ग्रॅममागे 237 मिलिग्रॅमपर्यंत असते. लोह, कॅल्शिअम, मॅंगनीज आदींनीही टोमॅटो समृद्ध असतो. टोमॅटोबाबत एक गोष्ट नेहमी घडते, ती म्हणजे त्याच्या किमती कधीही स्थिर नसतात. अनेकवेळा तर शेतकऱ्यांना माल बाजार समितीतच सोडून जावा इतकी वाईट वेळ येते. अशा वेळी टोमॅटो साठवणूकगृहांचा पर्याय काही जण मांडतात. मात्र, टोमॅटो सौरऊर्जेच्या साह्याने वाळवून त्याची पावडर तयार करण्याचाही एक पर्याय शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. त्याचे साधे सोपे तंत्रज्ञानही भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या अंतर्गत आंध्र प्रदेशातील रेडीपल्ली, अनंतपुरम येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञांनी उपलब्ध केले आहे. ते थोडक्यात असे.
सुरवातीला पूर्ण पिकलेले टोमॅटो घ्यावेत. मुलायम वस्त्राने ते स्वच्छ कोरडे करावेत, जेणेकरून पृष्ठभागावर पाण्याचा अंश राहणार नाही. टोमॅटोचे उभे सहा ते आठ काप करावेत व ते लाकडी ट्रेमध्ये कोरडे करावेत. पावडर स्वरूपात त्यांची साठवणूक करता येते, अथवा त्याचे सुकलेले काप पॉलिथिन पेपरवरती ठेवता येतात. टोमॅटोच्या वाणानुसार एक किलो टोमॅटोपासून 50 ते 55 ग्रॅम पावडर मिळते. जर ग्राहकाला शंभर ग्रॅम टोमॅटो एवढा वापर करायचा असेल, तर त्याला केवळ पाच ग्रॅम पावडरीचा वापर केला तरी ते पुरेसे होते. विशेष म्हणजे टोमॅटोमधील पोषक द्रव्यांचा फारसा काही ऱ्हास होत नाही.
सूर्यप्रकाशात टोमॅटो काप सुकवणीचा कालावधी
तापमान (अंश सेल्सिअस) सुकण्याचा कालावधी (दिवसांमध्ये) 34 5- 6 38 3- 4 40 व त्याहून अधिक 2- 3
सोयाबीनपासून सोयातेल, सोयानट्स, सोया पीठ, सोया प्रोटिन्स, सोया दूध, सोया फ्लेक्स, सोया सॉस, सोया नगेट्स हे पदार्थ तयार केले जातात. या उत्पादनांना बाजारपेठेत मागणी वाढते आहे. त्यामुळे येत्या काळात सोयाबीनवर आधारितच उद्योगांना विशेष चालना देणे आवश्यक आहे. बी. बी. गुंजाळ सोयाबीनच्या पिठापासून पौष्टिक आटा तयार करता येतो. तसेच सोयामिश्रित बन, केक, बिस्कीट, पाव असे बेकरी पदार्थ तयार करता येतात. याचबरोबरीने स्थानिक बाजारपेठेचा विचार करता सोयामिश्रित चकली, शेव, लाडू, पापड, फरसाण, पकोडा, बुंदी, कढी तयार करता येऊ शकते. सोयाबीनच्या दुधापासून व्हॅनिला, क्रीम, चॉकलेट, इलायची स्वाद असलेले सुगंधी दूध तयार करता येते. बाजारपेठेच्या मागणीनुसार दही, श्रीखंड, आम्रखंड, लस्सी, योगर्ट, आइस्क्रीम, पनीर, टोफू-पराठा, पुलाव, पनीर पकोडा, कटलेट, सॅंडविच, पॅटीस, ब्रेडरोल, मटार पनीर, पालक पनीर तयार करता येते. सोया दूध प्रक्रियेनंतर उरणाऱ्या सोया पल्पचा वापर बर्फी, गुलाबजामून, हलवा, पीठ, पकोडी, पशुखाद्य बिस्कीट, शेव, डोसा. इडली, ढोकळा तयार करण्यासाठी केला जातो. दैनंदिन आहाराचा विचार करता डोसा, वडा, इडली इ. अन्नपदार्थांत जेथे कडधान्य व दालवर्गीय धान्याचा वापर केला जातो, त्यात 20 टक्क्यांपर्यंत सोयाबीनचा वापर करू शकतो. मोड आलेली सोयाबीन इतर मोड आलेल्या कडधान्यांप्रमाणे आहारात वापरावीत. छोले, राजमा, दालमखानी इत्यादी पदार्थांत सुद्धा सोयाबीनचा 20 टक्क्यांपर्यंत वापर करण्यास हरकत नाही.
डिफॅटेड सोया पीठ
सोयामीलपासून डिफॅटेड सोया पीठ तयार केले जाते. अशा पिठात प्रथिनांचे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत असते. तांदूळ, गहू, हरभरा यांच्यापासून तयार केलेल्या पिठाचा वापर ज्या पदार्थात होतो त्या ठिकाणी 15 ते 20 टक्क्यांपर्यंत सोया पिठाचा वापर करता येईल. ब्रेड, केक, पानकेक, बिस्कीट्स, शेव, फरसाण, चकली, बुंदी इत्यादी पदार्थांमध्ये प्रथिना ंचे प्रमाण वाढविणे व प्रथिनांची प्रत सुधारण्यासाठी 5 ते 15 टक्क्यांपर्यंत सोया पिठाचा वापर करता येईल.
पौष्टिक आटा
दहा टक्के सोया पिठाचा वापरासाठी व दहा किलो पौष्टिक आटा तयार करावयाचा झाल्यास नऊ किलो गव्हात एक किलो सोया पीठ मिसळून चपाती, रोटी, पुरी तयार करता येते. दहा टक्के सोया पीठ वापरामुळे प्रथिनांची मात्रा 11 टक्क्यांहून 16 टक्क्यांपर्यंत वाढते. जर डिफॅटेड सोया पीठ उपलब्ध नसले, तर सोयाबीन व गहू याच्या 1ः9 या प्रमाणानुसार पीठ तयार करावे. त्यासाठी सोयाबीन प्रथमतः भाजावे व ते वर निर्देश केलेल्या प्रमाणानुसार गव्हात मिसळून पीठ तयार करावे.
सोया पापड
पारंपरिक पद्धतीत उडीद डाळीच्या पिठापासून पापड तयार करतात. प्रथिनयुक्त तसेच वाजवी किमतीत पापड हवे असतील तर 70 टक्के उडीद ाळचे पीठ व 30 टक्के सोयाबीन पीठ यांच्या मिश्रणातून सोय पापड करता येतात. निव्वळ उडीद डाळ पिठाच्या तुलनेत मिश्रणातून मिळणाऱ्या पापडांमध्ये प्रथिनांचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढते.
सोया नट्स
भाजक्या शेंगदाण्यास पर्याय, वाजवी किमतीत प्रथिनांची उपलब्धता व आयसोफ्लेव्हानचा उत्तम स्रोत म्हणून सोयानट्सकडे पाहिले जाते. भाजके सोयानट्स करावयाचे झाल्यास सोयाबीन सर्वसाधारण आठ तास भिजविले जाते. पाण्याचा अंश काढल्यानंतर ओव्हन मध्ये 175 अंश से. तापमानाला त्यास भाजण्याची प्रक्रिया सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत केली जाते. सोयानट्समधील अन्नघटकांची तुलना बदाम, काजू व शेंगदाणे यांच्याशी तक्ता क्र. 1 मध्ये दर्शविलेली आहे. भाजक्या शेंगदाण्याच्या तुलनेत सोया नट्समध्ये स्निग्ध पदार्थांचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी असून प्रथिनांचे प्रमाण 50 टक्क्यांहून जास्त आहे. सोयानट्स वेगवेगळ्या स्वादात करता येऊ शकतात. सोयातेलाशिवाय सोयामीलचा वापर विविध अन्नपदार्थ तयार करण्यासाठी कसा करता येईल. तसेच सोयाबीन, तृणधान्ये व कडधान्ये यांचे योग्य प्रमाण वापरून परंपरागत पदार्थांबरोबरच एक्ट्रुडर कुकिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्नॅक फूडचे अनेक अन्नप्रक्रिया लघु उद्योग उभारता येणे शक्य आहे. सोया दूध आधारित विविध उद्योग लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सोया आधारित अन्नप्रक्रिया उद्योगासाठी लागणारी एक्स्ट्रुडर यंत्रसामग्री परदेशात विकसित झालेली असल्याने ही यंत्रणा आयात करण्यासाठी उद्योजकांना विशेष सवलत द्यावी. अन्नतंत्रज्ञानाशी संबंधित संस्थांनी सोयाप्र क्रिया आधारित उद्योगांशी सामंजस्य करार करणे आवश्यक आहे. त्यामुळे सोया आधारित अन्नप्रक्रियांमध्ये सुधारणा होतील. नवनवीन पदार्थ बाजारात येतील.
सोया दूध
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक किलो सोयाबीनपासून सहा ते आठ लिटर सोया दूध तयार करता येते. गाईच्या दुधासारखी त्याला चव अथवा रुची नसते. परंतु काही प्रमाणात साखर व चॉकलेट, इलायची, व्हॅनिला इ. स्वादांचा वापर केल्यास त्यास मधुर चव प्राप्त होते. प्रथिने, जीवनसत्त्व व क्षार यांचे प्रमाण सोया दुधात चांगले तर आहेच. त्याशिवाय ते कोलेस्टेरॉलयुक्त लेक्टोजविरहित तसेच सॅच्युरेटेड स्निग्ध पदार्थांचे व सोडिअमचे अत्यल्प प्रमाण असलेले बहुगुणी पेय आहे. मात्र त्यात कॅल्शिअमचे प्रमाण गाईचे दुधाची तुलना करता सहा पेटीने कमी आहे. सोया दुधाचा वापर पनीर, गरम व शीत पेये, फळांचा शेक, दही, योगर्ट. आइस्क्रीम इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी करता येतो.
सोया टोफू (पनीर)
सोया दुधापासून तयार केल्या जाणाऱ्या सर्व पदार्थांत लोकप्रिय असलेला पदार्थ म्हणजे सोय टोफू (पनीर) हा होय. टोफू तयार करताना गरम दुधावर साकाळण्याची प्रक्रिया करून त्यातील द्रवरूप पदार्थ बाजूस काढला जातो. एक किलो सोयाबीनपासून 1.5 ते 2 किलो सोय टोफू प्राप्त होतो. रेफ्रिजरेटरमध्ये टोफू सर्वसाधारण दहा दिवस टिकू शकतो. पारंप रिक भारतीय डिशेसमध्ये विशेषतः मटार पनीर, पालक पनीर, पराठा तसेच स्नॅक्सचा विचार करता सोया बर्गर, पॅटीस, ब्रेडरोल, सॅंडविच, पकोडा, टिक्का इत्यादींमध्ये सोया पनीरचा वापर करता येईल.
सोया पल्प
सोया दूध तयार करताना शिल्लक राहणारा चोथा म्हणजे सोय पल्प होय. त्यात मोठ्या प्रमाणात प्रथिने (30 टक्के), स्निग्ध पदार्थ (दहा टक्के), तंतुमय पदार्थ (आठ-दहा टक्के) व पिष्टमय पदार्थ (40 टक्के) इत्यादी अन्न घटक असतात. सोया पल्प, इतर तृणधान्य व कडधान्य वापरून ढोकळा, डोसा, इडली, चकली, फरसाण, शेव, बिस्किट्स, पीठ पशुखाद्य यांसारखे पदार्थ तयार करता येतात.
सोया सॉस
सोया सॉसचा वापर विविध अन्नपदार्थांना स्वाद तसेच त्यांची रुची वाढविण्यासाठी होतो. काळसर तांबूस रंगाचे हे द्रव सोयाबीनवर आंबविण्याची पद्धत वापरून तयार केले जाते. त्यामुळे सोयाबीनमधील विविध अन्नघटकांवर जैविक प्रक्रिया होऊन त्याचे रूपांतर पचावयास सोपे असलेल्या पदार्थांमध्ये म्हणजे अमिनो ऍसिड्स फॅटी ऍसिड व साध्या शर्करामध्ये होते. सोया सॉस वर्षभर टिकू शकते.
सोया प्रोटिन पावडर
सोया पीठापासून सोया प्रोटिन कॉन्सन्ट्रेट्स व सोया आयसोलेट तयार करता येतात. तर सोया प्रोटिन कॉन्सन्ट्रेट्स व सोया आयसोलेटपासून सोया प्रोटिन पावडर तयार करता येते. विविध प्रकारच्या पेयांमध्ये याचा वापर घनता, चव व स्वादिष्टपणा वृद्धिंगत करणे, प्रथिने, क्षार तसेच जीवनसत्त्वाची उपलब्धता वाढविणे यासाठी केला जातो.
सोयायुक्त बेकरी पदार्थ
गहू पिठात तीन ते पाच टक्के सोया पिठाचा वापर केल्यास ब्रेडचा रंग व पोत सुधारण्यास मदत होते. स्कीम मिल्कला पर्याय म्हणून सोया पीठ व व्हे यांचे मिश्रण वापरता येते. सोया पिठात लायसिन या अमिनो ऍसिडचे प्रमाण चांगले असते; परंतु गव्हाच्या मैद्यात लायसिनची कमतरता असून सिस्टीन या अमिनो ऍसिडचे प्रमाण चांगले आहे. जर गव्हाच्या मैद्यात सोया पीठ मिसळल्यास लायसिन व सिस्टीन या दोनही अमिनो ऍसिडचा पुरवठा शरीरास होऊ शकतो. त्याशिवाय मैदा मिश्रित सोया पिठाच्या प्रथिनांची गुणवत्ता फ ारच चांगली असते.कुपोषित बालकांना पूरक अन्न म्हणून सोयायुक्त बिस्किटाचा आहार देता येईल. त्यात सर्वसाधारण 12 टक्के प्रथिने (बाजारात उपलब्ध असलेल्या बिस्किटां पेक्षा 50 क्के जास्त). 24 टक्के स्निग्धयुक्त पदार्थ व 500 किलो कॅलरी उष्मांक प्रति 100 ग्रॅम असू शकते. लहान मुलांना (सहा ते दहा वर्षे वयोगट) दररोज चार बिस्किटे खाऊ घातल्यास त्यांना 12 टक्के प्रथिने व 100 किलो ऊर्जा मिळू शकते.
(लेखक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे येथे प्रकल्प सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.)
सीताफळापासून बनवा पावडर, जॅम, रबडी
सीताफळापासून बनवा पावडर, जॅम, रबडी
सीताफळाच्या गरापासून पावडर, जॅम, पेये, सिरप, मिल्कशेक, रबडी, आइस्क्रीम, श्रीखंड हे पदार्थ तयार करता येतात. गराचा वापर विविध मिठाई, बेकरी व कन्फेक्शनरीमध्ये केला जातो. बाजारपेठेतील मागणीनुसार विविध पदार्थ तयार करणे शक्य आहे.
गर काढून साठविणे
1) प्रथम पिकलेली निरोगी चांगली सीताफळे निवडून घेऊन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर फळांचे दोन भाग करावेत. बियांसहित गर अलगदपणे चमच्याने काढून घ्यावा. 2) हा काढलेला गर मिक्सरला लावून 1 मि.मी. स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात घ्यावा. त्यामध्ये 500 पीपीएम ऍस्कॉर्बिक आम्ल व 700 पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाईट मिसळून गरम करावा. हा गर निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये किंवा रिटॉर्टेबल पाऊचेसमध्ये भरून हवाबंद करावा. परत पाश्चराईज करून, थंड करून, लेबल लावून, थंड ठिकाणी (शीतगृहात) साठवून ठेवाव्यात. 3) गर साठवण कालावधीमध्ये काळा पडण्याची शक्यता असते म्हणून तो थंड तापमानाला ठेवावा. 4) या पद्धतीशिवाय त्या काढलेल्या गरामध्ये 500 पीपीएम ऍस्कॉर्बिक आम्ल व 700 पीपीएम केएमएस मिसळून तो उणे 20 अंश सेल्सिअस तापमानास गोठवून ठेवल्यास एक वर्षापर्यंत चांगला राहतो. 5) हा गर आपणास विविध पदार्थ तयार करण्यासाठी वर्षभर वापरता येतो. या गोठविलेल्या सीताफळाच्या गरास स्थानिक तसेच परदेशी बाजारपेठांत चांगली मागणी आहे.
गराची पावडर
1) फळाचा काढलेला गर घेऊन त्यामध्ये 500 पीपीएम ऍस्कॉर्बिक आम्ल व 700 पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाईट व 2 ते 3 टक्के माल्टो डेक्स्ट्रीन मिसळून स्प्रे ड्रायरमध्ये किंवा ड्रम ड्रायरमध्ये 5 ते 8 टक्के पाण्याचा अंश येईपर्यंत वाळवावा. 2) यानंतर तयार झालेली पावडर निर्वात केलेल्या पिशवीमध्ये भरून, थंड ठिकाणी साठवून ठेवावी. 3) अशा प्रकारे तयार केलेली पावडर आइस्क्रीम, कन्फेक्शनरी तसेच श्रीखंड, मिल्कशेक, टॉफी इत्यादी पदार्थ तयार करताना वापरता येते. या पावडरला परदेशी बाजारपेठांमध्ये चांगली मागणी आहे.
जॅम
1) गराच्या वजनाएवढी साखर मिसळून तो गरम करावा, सतत ढवळत राहावे. नंतर यामध्ये 2 ते 5 ग्रॅम प्रतिकिलो गर या प्रमाणात सायट्रिक आम्ल मिसळून ते मिश्रण घट्ट होईपर्यंत म्हणजेच तुकड्यांत पडेपर्यंत शिजवावे. 2) या वेळी मिश्रणाचा टीएसएस 68 ते 69 टक्के असतो. 3) तयार झालेला जॅम निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून, बाटल्या थंड करून, त्यावर मेणाचा थर देऊन किंवा ऍल्युमिनियम फॉईल लावून, हवाबंद करून झाकण लावावे. बाटल्या थंड आणि कोरड्या जागी साठवाव्यात.
सरबत
1) गर 15 टक्के, साखर 15 टक्के व सायट्रिक आम्ल 0.25 टक्के घेऊन उत्तम प्रकारे सरबत करता येते. प्रथम गर घेऊन त्यामध्ये प्रमाणात मोजून घेतलेली साखर, सायट्रिक आम्ल व पाणी मिसळून ते चांगले ढवळून घ्यावे. हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळावे. थंड झाल्यावर त्याचा आस्वाद घ्यावा. 2) जर हे सरबत जास्त काळ साठवून ठेवायचे असल्यास ते गरम करून त्यामध्ये 100 पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाईट मिसळून निर्जंतुक केलेल्या 200 मि.ली.च्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून, झाकण लावून ठेवावे. परत पाश्चराईज करून, थंड करून, लेबल लावून, थंड ठिकाणी बाटल्या साठवून ठेवाव्यात. अशा तऱ्हेने तयार केलेले सरबत 1 ते 2 महिने टिकवून ठेवता येते.
रबडी
1) रबडी तयार करण्यासाठी गर एक किलो घेऊन त्यामध्ये 900 मि.ली. दूध आणि 100 ग्रॅम साखर मिसळून चांगले ढवळून गाळून घ्यावे. हे मिश्रण 15 ते 20 मिनिटे गरम करावे. 2) थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवून त्याचा आस्वाद घ्यावा.
श्रीखंड
1) सीताफळाचा गर किंवा पावडर वापरून उत्तम प्रतीचे श्रीखंड तयार करता येते. या श्रीखंडास चांगली चव असते. 2) गर 100 ग्रॅम, साखर 500 ग्रॅम व 400 ग्रॅम चक्का मिसळून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स मिसळून फ्रिजमध्ये ठेवून थंड झाल्यावर त्याचा आस्वाद घ्यावा.
मिल्कशेक
1) सीताफळाचा गर किंवा पावडर वापरून उत्कृष्ट प्रतीचा मिल्कशेक तयार करता येतो. 2) यासाठी गाईचे किंवा म्हशीचे स्वच्छ दूध गाळून घेऊन गरम करून ते प्रमाणित करावे. नंतर ते 70 अंश सेल्सिअस तापमानास 15 मिनिटे गरम करावे. त्यामध्ये 0.40 टक्के सोडियम ऍल्जिनेट मिसळून 10 टक्के साखर आणि 10 टक्के गर किंवा पावडर मिसळून हे मिश्रण चांगले गाळून घ्यावे. त्यानंतर 70 अंश सेल्सिअस तापमानास 30 मिनिटे गरम करावे. नंतर ते 10 अंश सेल्सिअस तापमानास तीन तास थंड करून घ्यावे. परत ते -2 अंश सेल्सिअस ते -4 अंश सेल्सिअस तापमानाला सात मिनिटे थंड करून मिक्सरला घुसळवून त्याचा आस्वाद घ्यावा.
गुणधर्म आणि उपयोग
1) फळे तयार होण्यास फलधारणेपासून जातीपरत्वे 135 ते 150 दिवस लागतात. हे फळ झाडावरून काढल्यानंतर पिकते. म्हणून त्याची काढणी पूर्ण वाढीच्या वेळी करतात. 2) डोळा पडलेली सीताफळे काढल्यास दोन-तीन दिवसांत पिकून खाण्यास तयार होतात. 3) हे अत्यंत नाशवंत फळ आहे. पिकल्यानंतर एक-दोन दिवसांपेक्षा जास्त काळ साठविता येत नाही. 4) फळांचा हंगाम सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत असतो. पिकलेल्या सीताफळामध्ये सर्वसाधारणपणे 50 टक्के गर, 20 टक्के टीएसएस व 0.30 टक्के आम्लता असते. 5) फळे अत्यंत नाशवंत असल्याने त्यांची दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त काळ साठवण करता येत नाही. गरामध्ये पोषणमूल्य चांगले असते. 6) पिकलेल्या सीताफळामध्ये शर्करा, प्रथिने व लोह यांचे प्रमाण भरपूर असते. 7) सीताफळाच्या पानांमध्ये ऍकोरिन आणि अनोनिन ही अल्कालॉईड्स असतात, त्यामुळे कोणताही प्राणी याची पाने खात नाही. 8) पानांचा लेप डोकेदुखीवर गुणकारी आहे. 9) झाडामध्ये हायड्रोसायनिक आम्ल असल्याने त्या झाडास वाळवी लागत नाही. 10) सीताफळाच्या बियांपासून काढलेल्या तेलाचा उपयोग साबण तयार करण्यासाठी होतो, तसेच पेंडीचा उपयोग खत म्हणून केला जातो.
सीताफळाच्या 100 ग्रॅम गरामध्ये पोषण मूल्यांचे प्रमाण
1) गर आइस्क्रीमसाठी मोठ्या प्रमाणावर वापरतात. गरापासून जॅम, जेली, पावडर, टॉफी, श्रीखंड, रबडी, मिल्कशेक इत्यादी पदार्थ तयार करता येतात. 2) गर नियमित सेवन केल्याने अशक्तपणा दूर होतो. 3) पिकलेल्या फळाच्या सालीचा उपयोग जखमा बऱ्या करण्यासाठी होतो. बियांचा लेप जनावरांच्या जखमा बऱ्या करण्यासाठी केला जातो. 4) फळाचा गर शुक्राणूवर्धक, तृष्णावर्धक, बलवर्धक, उत्साहवर्धक, पचनशक्ती वाढविणारा व पित्ताविकार कमी करणारा आहे. हाडांच्या व दातांच्या मजबुतीसाठी उपयोगी. हृदयाची कार्यक्षमता वाढते, रोगप्रतिकारशक्ती वाढते.
संपर्क – डॉ. विष्णू गरंडे – 9850028986 (लेखक शाहू कृषी तंत्र विद्यालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे प्राचार्य आहेत)
शिंपल्यातून खरे मोती उत्पादन
शिंपल्यातून खरे मोती उत्पादन
मोत्यांचे तीन प्रकार
आपण जे मोत्यांचे दागिने घालतो अगर सोन्यांच्या दागिन्यात जे मोती मढवलेले असतात त्या मोत्यांचे तीन प्रकार आहेत.
१) नसर्गिक २)संवर्धित ३)कृत्रिम
यातला संवर्धित मोती हा ठराविक प्रकारच्या मोती संवर्धित करावयाच्या शिंपल्यात एक छोटीशी शस्रक्रिया करून न्युक्लीअसचे (ठराविक शिंपल्याचा एक तुकडा अगर भुकटी) रोपण करून गोड्या पाण्यात तो शिंपला ३ वर्षे ठेवला जातो. आणि त्या शिंपल्यात तयार झालेला मोती संवर्धित मोती होय.हा मोती नैसर्गिक मोत्यासारखाच असतो. तेवढयाच गुणवत्तेचा असतो.
कृत्रिम मोती मात्र काचेचे तुकडे किंवा मनी माशाच्या खावल्यांपासून बनवलेल्या द्रावणात बुडवून जो थर निर्माण होतो टो वाळवून मोती तयार केला जातो. अर्थात, या मोत्यावरचा हा थर कालांतराने फिका पडतो. थर निघून जातो. तसेच या कृत्रिम मोत्याचा आरोग्यासाठी उपयोग होत नाही. टो खोटा असतो. मात्र संवर्धित मोती हा खरा असतो. अशा मोत्याची निर्मिती करण्यासाठी गोडे पाणी, विशिष्ट प्रकारचा जिवंत शिंपला आणि ग्राफ्त टिश्यू न्युक्लीअस इ.गोष्टी आवश्यक असतात.
खऱ्या पाण्यातील कवचधारी (शिंपला) मत्स्य जीवापासून मिळणारे मोती हे उच्च गुणप्रतीचे असतात पण त्याचे संवर्धन करणे जाकीरीचे असते. गोडया पाण्यातल्या कवचधारी मत्स्याजीवापासून मोती तयार करण्याचे तंत्र करण्यासारखे असते. हे मोती हि उच्च प्रतीचे असतात. यांच्यापासून मोती निर्मिती करणे हि एक फायदेशीर आणि जमेची बाब आहे. त्यांचा गोडया पाण्यातला साठा मोठा असतो. त्यांना उपद्रव कमी असतो आणि संवर्धनाची पद्धत सोयीस्कररीत्या विकसित करता येते म्हणून गोडया पाण्यातल्या शिंपल्यापासून (कवचधारी मात्स्य्जीव) मोती मिळवणे सोपे जाते. गोडया पाण्यात एकूण ५० प्रकारचे शिंपले आहेत, पण त्यातल्या संथ आणि वाहत्या पाण्यातल्या २-३ जातीच फक्त मोत्याच्या संवर्धनासाठी उपयुक्त आहे आणि लामिलीडेंस मार्जीलेनीस आणि लामिलीडेंस कोरीआनसीस या संथ पाण्यांतल्या, तर वाहत्या पाण्यातल्या पराशिया कोरुगेटा त्यांचा मोती संवर्धनासाठी वापर करावा.
प्रत्यक्ष मोत्यांचे संवर्धन करण्यासाठी असे शिंपले गोळा करून संवर्धन करण्याच्या ठिकाणी आणावेत. न्युक्लीअस रोपण शस्रक्रियेकरिता भृण प्रत्यारोपण पद्धतीसारखेच डोनर आणि रेसिपंटची आवश्यकता असते. डोनर म्हणजे रोपणाकरिता लागणाऱ्या टिश्यूची पूर्तता करणारा शिंपला आणि रेसीपंट म्हणजे रोपण शस्रक्रिया करवून घेऊन प्रत्यक्ष मोती संवर्धन करणारा शिंपला. डोनर शिंपल्यातून विशिष्ट पद्धतीने ग्राफट टिश्यू आणि मॅटल टिश्यू मिळवण्यात येतो. हे ग्राफ्त टिश्यू आणि मॅटल टिश्यू रेसीपटमध्ये न्वूक्लीआस रोपणासाठी वापरतात. प्रत्यक्ष न्युक्लीआस रोपणासाठी करण्यासाठी तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाची थोडी फार गरज असते. प्रशिक्षण घेतल्यास न्वूक्लीआस शस्रक्रिया (वेगवेगळ्या कलम पद्धतीचे प्रशिक्षण घेतल्याप्रमाणे) करणे सोपे जाते. मार्च ते मे या दरम्यान हि न्युक्लीआस रोपण शस्रक्रिया करण्यासाठी चांगला कालावधी असतो. कारण शास्रक्रियेची जखम लवकर भरते. मोती तयार होण्याची प्रक्रिया वेगात होते.
न्युक्लीआस रोपणाच्या (शस्रक्रिया) ३ पद्धती आहेत. त्या म्हणजे १) मॅटल कॅविटी इन्सर्षण २) मॅटल टिश्यू इन्सर्षण ३) गोनाडल इन्सर्षण. या पद्धती कशा करायच्या याचे प्रशिक्षण घेणे महत्वाचे आहे.
शास्रक्रीयेद्वारे रोपण केलेले शिंपले गोडया पाण्यात २-३ वर्षे पाळावे लागतात. हे शिंपले पाण्यातील सूक्ष्म वनस्पती प्लवगांवर उपजीविका करतात. म्हणून त्याची चांगली वाढ होण्यासाठी त्या गोडया पाण्यात शेण आणि सुपर फोस्फेटचा वापर करावा. पहिल्या वर्षापेक्षा दुसर्या आणि तिसर्या वर्षी मोती तयार करण्याच्या द्रावणाचे प्रमाण चांगलेच असते म्हणून गुणवत्तेचे मोती दुसर्या वर्षापासून, तर तिसर्या वर्षी जास्त गुणवत्तेचे मोती मिळतात. पहिल्याच वर्षीच जर मोती काढून घेतले तर ते वेडेवाकडे निकृष्ठ दर्जाचे असतात. तयार झालेले मोती शिंपल्यातून काढून घेतल्यानंतरही त्याच्यावर स्वच्छ करण्याच्या, पारदर्शीपणा येण्यासाठी आणि रंगीतपणा येण्यासाठी काही प्रक्रिया कराव्या लागतात. याही प्रशिक्षणात शिकवल्या जातात. अशा तयार झालेल्या गुणवत्तेच्या खरया मोत्यांना मोठी किमतही मिळते आणि मागणी तर प्रचंड आहे.
शेती पूरक व्यवसाय – मोती संवर्धन
आतापर्यंत हा मोती संवर्धनाचा व्यवसाय खाजगी व्यक्तीपुरताच मर्यादित आहे. हा कुटीर उद्योग म्हणून शेतकऱ्यांनी, तरुण बेरोजगारांनी छोट्याश्या प्रशिक्षनानंतर सुरु करावा. कारण गोडया पाण्याची उपलब्धता खूप आहे शिवाय अत्यल्प खर्चाचा, कमी मेहनतीचा आहे. प्रचंड मागणीचा, प्रचंड पैसा मिळवून देणारा आहे. म्हणून खेड्यापाड्यात शेतीच्या इतर पूरक व्यवसायाबरोबर गोडया पाण्यात मोती संवर्धन व्यवसाय सुरु करावा हाच या पाठीमागचा उद्देश आहे.
स्त्रोत – कृषी प्रवचने, प्रल्हाद यादव
गुलाबापासून तयार करा गुलकंद
गुलाबापासून तयार करा गुलकंद
गुलकंदाला आयुर्वेदिक महत्त्व आहे. गुलकंद हा गुलाबपाकळ्या आणि खडीसाखर याचे मिश्रण करून तयार झालेला पदार्थ आहे. घरच्या घरी आपण हा पदार्थ तयार करू शकतो. गुलाबशेती करणाऱ्यांसाठी; तसेच महिला बचत गटांसाठीही गुलकंदनिर्मिती हा चांगला जोडधंदा आहे. गुलाब फुलांचा उपयोग हार बनविण्यासाठी होतोच, त्याच बरोबरीने गुलकंद, गुलाबपाणी, अत्तर, गुलाब तेल, उदबत्ती बनविण्यासाठी केला जातो. गुलकंद करण्यासाठी देशी जातीच्या लाल फुलांचा वापर करावा. याचबरोबरीने एव्हान, क्रिमझन ग्लोरी हार्ट थ्रॉब, ब्ल्यू मून, मॉन्टेझुमा, हैद्राबादी गुलाब या सुवासिक फुलांच्या जाती आहेत.
गुलकंद करण्याची कृती
साहित्य 1) गुलाब पाकळ्या, 2) खडी साखर, 3) प्रवाळ पिष्ठी 1) गुलकंद करण्यासाठी देशी जातीच्या लाल फुलांचा वापर करावा. म्हणजे गुलकंदाला रंग व सुगंध चांगला येतो. देशी गुलाबांना जेवढा सुगंध असतो, त्या प्रमाणात विदेशी गुलाबांना नसतो. 2) प्रथम पूर्ण उमललेल्या निरोगी फुलांच्या पाकळ्या वेगळ्या कराव्यात. पाकळ्यांचे बारीक तुकडे करावेत. एक किलो खडी साखर (1ः1) या प्रमाणात एक थर पाकळ्या आणि एक थर खडी साखर असे काचेच्या बरणीत भरावे. 3) काचेची बरणी उन्हात 4 ते 5 दिवस ठेवावी. उन्हामुळे साखरेचे पाणी होते. आणि त्यात या पाकळ्या मुरतात. असा चविष्ट गुलकंद 21 ते 25 दिवसांत खाण्यासाठी तयार होतो.
गुलकंदाचे फायदे
1) एक उत्तम पाचक आहे. उष्णतेपासून होणारे विकार, ताप, रक्तपित्त, कांजिण्या, शारीरिक दौर्बल्यावर उपचारासाठी गुलकंदाचा चांगला उपयोग होतो. 3) गुलकंद कांतिदायक तृष्णाशामक आहे. 4) गुलकंदामध्ये 10 टक्के प्रवाळ मिसळून वाढत्या वयाची मुले आणि शारीरिक दौर्बल्य असलेल्यांना दिल्यास ते शक्तिवर्धक म्हणून काम करते.
संपर्क – सुनीता चौहान -9422304948 (लेखिका कृषी विज्ञान केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथे कार्यरत आहेत.)
चिकूपासून जॅम, स्क्वॅश
चिकूपासून जॅम, स्क्वॅश
चिकूच्या पाकविलेल्या फोडी, जॅम, स्क्वॅश, फोडी हवाबंद करणे, भुकटी हे पदार्थ तयार करता येतात. हे सर्व पदार्थ तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली गोड फळे घ्यावीत. फळे स्वच्छ धुवावीत. साल काढावी. बिया काढून टाकाव्यात. फोडी कराव्यात.
पाकविलेल्या चिकूच्या फोडी
चिकूची व्यवस्थित पिकलेली, गोड चवीची फळे निरीक्षणपूर्वक निवडून घ्यावीत. फळे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. त्याचे चार तुकडे (लांबीप्रमाणे) करून बी पूर्णपणे काढून टाकावे. मिठाच्या दोन टक्के द्रावणामध्ये फळांचे तुकडे ३ ते ४ मिनिटे बुडवून ठेवावेत. नंतर फोडी ड्रायरमध्ये (४० अंश सेल्सिअस) किंवा सूर्यप्रकाशात पूर्ण एक दिवस वाळवाव्यात. दुसऱ्या दिवशी फळांचे तुकडे ४० अंश ब्रिक्स साखरेच्या पाकात पाच मिनिटे शिजवावेत. फोडी द्रावणातून बाहेर काढून पुन्हा सूर्यप्रकाशात अथवा ड्रायरमध्ये (४० अंश सेल्सिअस) तापमानात वाळवाव्यात. त्यापुढील दिवशी अनुक्रमे ५५ व ६५ अंश ब्रिक्स पाकामध्ये शिजवून वाळवाव्यात. नंतर फोडी चांगल्या वाळवाव्यात. कोरड्या फोडी प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून सीलबंद कराव्यात.
चिकू स्क्वॅश
चिकूच्या फोडी मिक्सर/ पल्परमध्ये घालून चांगला लगदा तयार करून घ्यावा. लगदा मलमलच्या कापडाने गाळून त्यातला रस काढून घ्यावा. एफपीओ प्रमाणीकरणानुसार (२५ टक्के रस, ४५ ते ५० टक्के एकूण विद्राव्य घटक व ०.७५ ते १ टक्का आम्ल) घटक पदार्थ घ्यावेत.
घटक पदार्थांचे प्रमाण
चिकू रस – १ किलो पाणी – १ लिटर साखर – १ किलो सायट्रिक आम्ल – ४० ग्रॅम
चिकू रस, साखर, पाणी, सायट्रिक ॲसिड यांचे एकजीव मिश्रण तयार करावे. हे मिश्रण गाळून घ्यावे. स्क्वॅश ८० ते ८२ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत गरम करावा. पोटॅशियम मेटाबाय सल्फाइट ७१० मिलिग्रॅम/ किलो स्क्वॅश किंवा सोडियम बेन्झोएट ६०० मिलिग्रॅम/ किलो स्क्वॅश या प्रमाणात थोड्या स्क्वॅशमध्ये एकजीव करून संपूर्ण स्क्वॅशमध्ये घालावे. गरम स्क्वॅश बाटल्यांमध्ये भरावा. झाकणे बसवावीत. स्क्वॅश थंड व कोरड्या जागेत ठेवावा. स्क्वॅश सहा महिने टिकतो.
चिकू भुकटी
चिकूची पक्व फळे धुऊन, साल व बी काढून घ्यावीत. फळांचे आठ तुकडे (लांबीप्रमाणे) करून सूर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्रात (५५ – ६० अंश सेल्सिअस, पाण्याचे प्रमाण ७-८ टक्के कमी होईपर्यंत) वाळवावेत. त्यानंतर यंत्राच्या साह्याने फोडींची भुकटी करावी. भुकटी २५० गेजच्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सीलबंद साठवून ठेवावी.
या भुकटीपासून मिल्कशेक तयार करता येते. मिठाई, आइस्क्रीम तयार करण्यासाठीसुद्धा वापर करता येतो.
चिकू जॅम
चिकूची पिकलेली फळे धुऊन, साल व बी काढावे. फळाचे तुकडे करून मिक्सर/ पल्परच्या साह्याने गर तयार करावा. प्रमाणीकरणानुसार (४५ टक्के गर, ६८ अंश ब्रिक्स घनपदार्थ, १ टक्का आम्ल) घटक पदार्थ घ्यावेत.
घटक पदार्थ – प्रमाण
चिकू गर – २ किलो साखर – १.५ किलो पाणी – २५० मि.लि. सायट्रिक आम्ल – १५ ग्रॅम पेक्टीन – १० ग्रॅम
गर, साखर, पाणी एकत्र करावे. मिश्रण शिजवावे. शिजविताना हळूहळू ढवळावे. जॅम आचेवरून उतरविण्यापूर्वी सायट्रिक आम्ल व पेक्टीन (थोड्या पाण्यामध्ये मिसळवून) घालावे. मिश्रणाचे तापमान १०५ अंश सेल्सिअस, विद्राव्य घटक ६८ अंश ब्रिक्स एवढे झाल्यावर जॅम तयार होतो. इतर चाचण्या (फ्लेक चाचणी, साखरेच्या दीडपट वजन) घेऊन जॅम तयार झाल्यावर गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या बाटलीमध्ये भरावा. थंड झाल्यावर बाटली सीलबंद करावी.
चिकूच्या हवाबंद फोडी
पिकलेल्या चिकूच्या फोडी बहर साइज कॅनमध्ये (२८० ग्रॅम) किंवा ए-२.५ साइज कॅनमध्ये (५०० ते ५५० ग्रॅम) भराव्यात. उर्वरित जागा साखरेच्या ५५ अंश ब्रिक्स पाकाने भरावी. कॅनच्या तोंडापासून १.२५ सें.मी. अंतर सोडावे. डबे ८० अंश सेल्सिअस तापमानाला निर्वात करून बंद करावेत. बटर साइज कॅन (२० मिनिटे) व ए २.५ कॅन अनुक्रमे २० व २५ मिनिटे उकळत्या पाण्यामध्ये ठेवावेत. नंतर कॅन गार पाण्याने थंड करावेत. कॅन थंड व कोरड्या जागेत ठेवावेत.
चिकू शेक
चिकूपासून चांगल्या प्रतीचा शेक तयार होतो. शेक तयार करण्यासाठी चिकूचा गर अथवा फोडींचे अतिशय बारीक-बारीक तुकडे करावेत.
घटक पदार्थ
चिकूचा गर/तुकडे – १०० ग्रॅम साखर – १३६ ग्रॅम – १५० ग्रॅम दूध – ७५० – ८०० ग्रॅम
स्टीलच्या पातेल्यामध्ये दूध गरम करावे. थंड झाल्यावर साय काढावी. दुधामध्ये साखर विरघळवून घ्यावी. नंतर त्यात चिकूचा गर अथवा तुकडे टाकावेत. हे मिश्रण मिक्सरमध्ये टाकून एकजीव करावे. शेक थंड होण्यास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावा. आवडीनुसार बर्फाचा चुरा टाकून शेक पिण्यास वापरावा.
डॉ. गीता रावराणे-मोडक – ९४२२३०२८६२
(लेखिका पद्मभूषण वसंतदादा पाटील ॲग्रिकल्चर कॉलेज, तळेगाव दाभाडे, आंबी जि. पुणे येथे कार्यरत आहेत)
चिकूपासून पावडर, बर्फी, चटणी
चिकूपासून पावडर, बर्फी, चटणी
चिकूमध्ये मोठ्या प्रमाणात लोह, 5.3 ते 7.4 मिलिग्रॅम तंतुमय पदार्थ आणि जीवनसत्त्व क असते. नोव्हेंबर महिन्यापासून जास्त प्रमाणात चिकू फळांची आवक होते, हे लक्षात घेऊन बाजारपेठेच्या मागणीनुसार चिकूपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करावेत.
चिकू चिप्स
साहित्य – पिकलेले चिकू
चांगले चिकू वेचून घ्यावेत किंवा पिकलेले चिकू घ्यावेत.
स्टेनलेस स्टीलच्या चाकूच्या साह्याने चिकूची साल काढून घ्यावी.
चिकूचे दोन भाग करून त्यातील मधला पांढरा भाग व बिया काढून घ्याव्यात.
त्यानंतर चिकूचे पातळ काप करावेत.
हे काप सोलर ड्रायर (वाळवणी यंत्रामध्ये) तीन दिवस वाळवावे.
त्यानंतर ग्राइंडरच्या साह्याने वाळलेल्या फोडींची भुकटी करावी.
तयार झालेली भुकटी 250 गेजच्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सीलबंद करून साठवून ठेवावी.
चिकू पावडरपासून पेय तयार करता येते. त्यासाठी चिकूची भुकटी दुधामध्ये 1ः20 या प्रमाणात मिसळून ढवळावी. त्यानंतर त्यामध्ये साखर मिसळून चिकू मिल्कशेक तयार करावा.
चिकू खोबरा बर्फी
साहित्य – चिकूचा लगदा – 1 वाटी खोवलेला नारळ – 1 वाटी साखर – 1 ते 2 वाटी दूध – 1 वाटी तूप – 2 चमचे कृती –
एक पसरट भांड्यात तूप घेऊन त्यात नारळ चांगला भाजून घ्यावा.
नंतर त्यात साखर व चिकूचा लगदा मिसळून ते मिश्रण चांगले घोटावे.
घोटत असतानाच एक वाटी सायीचे दूध त्यात मिसळावे. त्यानंतर हे मिश्रण एकजीव होऊन घट्टपणा येईल तोपर्यंत घोटत राहावे.
मिश्रण घट्ट झाल्यावर एका ताटाला तूप लावून त्यात तो लगदा पसरावा. चांगले थापून थोड्या वेळाने त्याच्या वड्या पाडाव्यात.
या वड्या चिकूच्या नैसर्गिक रंगामुळे चांगल्या दिसतात व चविष्ट लागतात.
चिकू चटणी
साहित्य- पिकलेले चिकू – 2 हिरव्या मिरच्या – 2 ते 3 लसूण पाकळ्या – 3 ते 4 कोथिंबीर – गरजेप्रमाणे चिंच – गरजेप्रमाणे मीठ व जिरेपूड – चवीप्रमाणे कृती –
चिकू सोलून त्याचे तुकडे करावेत. त्यातील बिया काढून घ्याव्यात.
वरील सर्व साहित्य चिकूमध्ये मिसळून मिक्सरमध्ये चटणी वाटून घ्यावी.
चिकू नारळ लाडू
साहित्य – चिकू पावडर – 1 वाटी सुके खोबरे – 1 वाटी रवा – 1 वाटी दळलेली साखर – 1 वाटी वेलचीची पावडर – 1 लहान चमचा तूप – दीड वाटी चारोळी – 20 ते 25 दाणे बेदाणे – 10 ते 15 कृती –
प्रथम रवा तुपात भाजून घ्यावा.
सुके खोबरे किसून, भाजून व वाटून घ्यावे.
नंतर एका भांड्यात भाजलेला रवा, भाजलेला खोबरे कीस, चिकू पावडर, साखर व इतर सर्व साहित्य एकत्र करावे. उरलेले तूप तापवून त्यात मिसळावे.
आपल्या आवडीप्रमाणे छोटे-मोठे लाडू बनवून घ्यावेत.
हे लाडू पौष्टिक असतात.
चिकू स्क्वॅश
साहित्य – चिकू लगदा – 1 किलो (10 ते 12 फळे) साखर – 1 किलो ( 5 मध्यम कप) पाणी – 1 लिटर (5 मध्यम कप) सायट्रिक आम्ल – 40 ग्रॅम कृती –
चिकूच्या फोडी मिक्सरमध्ये घालून चांगला लगदा तयार करून घ्यावा.
हा लगदा जाडसर कापडात बांधून घेऊन त्यातला रस काढून घ्यावा.
चिकूचा लगदा, साखर, पाणी व सायट्रिक आम्ल हे सर्व घटक एकत्र करून त्यांचे चांगले घोटून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे.
तयार झालेल्या मिश्रणात पोटॅशियम मेटाबायसल्फेट 600 मिलिग्रॅम प्रति किलो किंवा सोडियम बेंझोएट 710 मिलिग्रॅम प्रति किलो प्रमाणात मिसळावे किंवा तयार स्क्वॅश 80 ते 82 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत 25 मिनिटे गरम करून साठवावा.
तयार स्क्वॅश भरलेले कॅन किंवा बाटल्या साध्या पाण्याखाली धरून थंड कराव्यात. बाटल्यांमध्ये साठविलेला स्क्वॅश थंड कोरड्या जागेत ठेवावा, म्हणजे स्क्वॅश 6 महिन्यांहून अधिक काळ टिकतो.
चिकू जॅम
साहित्य –
चिकू लगदा – 2 किलो (25 फळे)
साखर – 2 किलो (6 ते 8 मध्यम कप) पाणी – 250 मिलि (1 मध्यम कप) सायट्रिक आम्ल – 15 ते 18 मिलिग्रॅम कृती –
चिकू स्क्वॅशच्या कृतीप्रमाणे फळांची निवड करून त्यांचे तुकडे करावेत. जॅमसाठी लागणारे सर्व घटक एकत्र करून ठराविक घट्टपणा येईपर्यंत शिजवावेत. * शिजविताना मिश्रण हळूहळू ढवळावे.
शिजलेले मिश्रण म्हणजे जॅम गरम असतानाच कॅनमध्ये किंवा भांड्यामध्ये भरावा.
चांगली पक्व फळे घेऊनही जॅम घट्ट झाला नाही तर त्यात थोडी पेक्टिनची पावडर टाकावी.
संपर्क – रूपाली देशमुख – 8698701177 (लेखिका कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, ता. डहाणू, जि. पालघर येथे कार्यरत आहेत.)
ज्वारी प्रक्रिया उद्योग
ज्वारी प्रक्रिया उद्योग
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत भरडधान्याचे उत्पादन वाढवून त्याचा दर्जा उंचावण्यासाठी “भरडधन्य विकास कार्यक्रम” राज्यात राबविला जात आहे.
यवतमाळ येथील कृषि विज्ञान केंद्र, (डॉ.पं.दे.कृ.वी.) येथे शासनाच्या कृषि आयुक्तालया मार्फत नुकतेच ज्वारी प्रकीया प्रात्यक्षिक युनिट सुरु झालेले आहे.
यवतमाळ जिल्ह्याचे वातावरण ज्वारी या पिकास अत्यंत पोषक आहे. खरीप व रबी या दोन्ही हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकरी ज्वारी पिक घेऊ शकतात.
मध्यंतरी ज्वारी या अतिशय पौष्टिक मुल्य असलेल्या पिकाकडे थोडे दुर्लक्ष झाले होते. मात्र भरडधान्य विकास कार्यक्रमाचे निमित्ताने ज्वारीचे महत्व पुन्हा वाढते आहे.
ज्वारी प्रक्रिया युनिटमध्ये एकूण चार यंत्रांचा समावेश होतो.
डी-स्टोनर
या यंत्रांद्वारे ज्वारीतील खडे, माती काडीकचरा निघून ज्वारी व ग्रेडिंग होते म्हणजेच जाड व बारीक दाणे वेगवेगळे होतात. प्रतवारी मुळे ज्वारीची गुणवत्ता सुधारते शेतक-याला चांगली किंमत मिळते. प्रती तासाला पाचशे किलो (१/२ क्विंटल) धान्य स्वच्छ करण्याची या यंत्राची क्षमता आहे.
डी-हलर
या यंत्रांद्वारे ज्वारीला पॉलिश केले जाते. खरीप ज्वारीला पावसामुळे कधी कधी काजळी येते.
अशा ज्वारीला बाजार भाव एकदम कमी मिळtoतो व खाण्या करिता वापरल्यास बुरशीमुळे आरोग्यास अपाय होतो.
डीहलर मधून काळ्या व बेरंग ज्वारीवरील काळपट कवच घासून काढले जाते पांढरी स्वच्छ
ज्वारी मिळते. परिणामी बाजारभाव चांगला मिळतो.
पल्वरायझर
हे पिठाच्या गिरणी सारखे यंत्र असून त्यात स्वच्छ पॉलिश केलेली ज्वारी टाकुन त्याचे वेगवेगळ्या जाडीचे पीठ तयार केले जाते. तसेच ज्वारीची सोजी किंवा दलीया ज्वारीचा रवा, पीठ इ. आवश्ककते नुसार ज्वारी दळण्या करिता एक अॅडजस्टेबल हँडल यामध्ये आहे.
शिफ्टर
पल्वरायझर मधून दळून काढलेला भरडा या शिफ्टर मध्ये टाकला जातो. याला दोन बाजूला रवा व पीठ वेगवेगळे करण्याचीसुविधा असते. पीठ गाळून, उत्तम गुणवत्तेचा ज्वारीचा रवा यातून वेगळा होतो. मिळालेला उत्तम गुणवत्तेचा रवा पॅकिंग मशीनने प्लॅस्टिक पिशवीत भरून लेबलिंग केले जाते.
ज्वारीच्या पिठापासून भाकरी, पापड, धापोडे, पळीपापड ई. पदार्थच आमच्या गृहिणींना माहिती होते. परंतु या वेगवेगळ्या मशिनच्या सहाय्याने मिळणा-या जाड व बारीक पिठापासून इडली मिक्स, चकली मिक्स, ढोकळा, उतप्पा, ज्वारीच्या शेवया इ. नवीन पदार्थ तयार करता येतात. उत्तम प्रतिचा रवा, दलिया यांचेही चांगले मार्केटिंग करता येते.
आरोग्याप्रती जागरूक असण्यासाठी व मधुमेह, रक्तदाब, कँन्सर, अतिजाड
या वर्गात येणा-या व्यक्तींकरिता आहारातील ज्वारीचे अनन्यसाधारण महत्व आहे. ज्वारीतील पौष्टिक गुणधर्मा बद्दल मुख:त्वे त्यातील उच्च दर्जाच्या डायटरी फायबर्स ला कुठलाही पर्याय नाही.
ज्वारीमध्ये ७२% कर्बोदके ११.६% प्रथिने व १.९% मेदाचे प्रमाण आहे. तसेच प्रथीनामध्ये अल्ब्युमीन, ग्लोंब्युलीन, प्रोलॅमीन व ग्लाटेलीन इ. या समावेश आहे. डायटरी फायबर्स मुळे व प्रथिनांमुळे नर्व्हस सिस्टीम सशक्त होण्यास व चयापचयाची प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. मलबद्धता व
मलावरोध यासारखे आजार उद्भभवत नाही. सर्व प्रकारची पौष्टिक मुल्ये जसे जीवनसत्वे, खनिजे व डायटरी फायबर्स ज्वारीमधून संतुलित प्रमाणात मिळतात.
बचत गटांकरिता या ज्वारी प्रक्रिया युनिटद्वारे रोजगाराची नवीन संधी उपलब्ध झाली आहे. काळी ज्वारी पॉलिश करून देणे, ज्वारीचे ग्रेडिंग करून देणे, ज्वारीचे वेगवेगळे जाडीचे पीठ तयार करून व्यवस्थीत व आकर्षक पॅकिंग केल्यास उत्तम व्यवसाय उदयाल येऊ शकतात.
तसे ‘रेडी टू यूज’ व ‘ इंस्टंट मिक्स ‘ इ. प्रक्रिया पदार्थ ज्वारीपासून तयार करता येतील.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे ज्वारी प्रक्रिया केंद्रात शेतकरी गट, शेतकरी महिला व ग्रामीण युवक युक्तिंकरीता या विषयावर प्रशिक्षण देण्याची व्यवस्था उपलब्ध आहे.
संपर्क :- डॉ. प्रमोद यादगीरवार , कार्यक्रम समन्वयक किंवा प्रा. नीलिमा पाटील ,विषय विशेषज्ञ दूरध्वनी क्र.(०७२३२) २४८२३५
पनीर तयार करा
पनीर तयार करा
पनीर तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. त्यासाठी नवनवीन यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. परंतु या महागड्या यंत्रांशिवाय सुद्धा घरच्या घरी पनीर तयार करता येऊ शकते. पनीरसाठी म्हशीचे दूध उत्तम असते. कारण त्यात स्निग्धांशाचे प्रमाण गाईच्या दुधाच्या तुलनेने अधिक असते. पनीरपासून अनेक उपपदार्थ उदा. पालक पनीर, मटार पनीर, आलू पनीर, पनीर टिक्का इ. तयार करता येऊ शकतातदूध हा अतिशय शीघ्रपणे खराब होणारा पदार्थ आहे. त्यामुळे दूध उत्पादकांचे दूध लवकरात लवकर बाजारात जाणे, त्यासोबतच ग्राहकांपर्यंत पोचणे आवश्यक असते. यामुळेच दुग्धोत्पादकाची दूधदराबाबत क्रयशक्ती शिथिल होते आणि बहुतांश वेळी मिळेल त्या दरात दूध विकणे क्रमप्राप्त ठरते. जेथे शीतकरण यंत्राची सुविधा आहे, सरकारी तत्त्वाखाली दुग्ध संस्थेमार्फत प्रामाणिकपणे राबत असलेली शाश्वत बाजारपेठ आहे, तेथे हा प्रश्न नाही; परंतु बहुतांश महाराष्ट्रात अशाश्वत बाजारभाव, ग्रामस्तरावर शीतकरण सुविधेचा अभाव, वाहन व्यवस्थेचा अभाव हे दुग्ध व्यवसायाकडे अनाकर्षक करणारे ठळक मुद्दे आहेत. उत्पादित झालेल्या दुधाचा टिकविण्याचा काळ वाढविण्यासाठी दूध उत्पादकांनी दुधापासून तयार होणारे मूल्यवर्धित पदार्थ उदा. पनीर, खवा, चीज, तूप इत्यादी तयार करणे या आवश्यक आहे. दुधापासून घरच्या घरी पनीर कसे करता येईल याबाबत माहिती करून घेऊ.
पनीर म्हणजे काय?
दुधाचे आम्ल साकळीत (रलळव लेरर्सीश्ररींशव) करून त्यातील जलतत्त्वाचे प्रमाण दाब देऊन कमी केलेला पदार्थ म्हणजे पनीर होय. पनीर हे सामान्य दुधापेक्षा जास्त काळ टिकून राहते म्हणून बाजारात पनीरला भरपूर मागणी आहे. शाकाहारी व्यक्तींना प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणून पनीर देशात अतिशय प्रसिद्ध आहे. पनीरपासून अनेक उपपदार्थ तयार करता येऊ शकतात. उदाहरणार्थ पालक पनीर, मटार पनीर, आलू पनीर, पनीर टिक्का इ. पनीर तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. त्यासाठी नवनवीन यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत; परंतु पशुपालक या महागड्या यंत्राशिवाय सुद्धा घरच्या घरी पनीर तयार करू शकतो. पनीरसाठी म्हशीचे दूध उत्तम असते. कारण त्यात स्निग्धांशाचे प्रमाण गाईच्या दुधाच्या तुलनेने अधिक असते.
लाकडी पेटी तयार करणे (पनीर दाब पेटी)
यासाठी सर्वसाधारणपणे 45 सें.मी. लांब, 25 सें.मी. रुंद आणि 25 सें.मी उंच या आकाराची लाकडी पेटी तयार करावी, या पेटीसाठी वापरलेल्या लाकडी फळीला चारही बाजूने बारीक बारीक छिद्रे असावेत. पनीर तयार करताना दुधातील पाणी (व्हे) निघण्यासाठी ही छिद्रे आवश्यक असतात.
पनीर बनविण्याची पद्धत
एका स्वच्छ पातेल्यामध्ये स्वच्छ, निर्भेळ आणि ताजे सहा ते आठ लिटर विशेषतः म्हशीचे दूध घ्यावे. हे दूध 82 अंश से. तापमानावर पाच ते आठ मिनिटे तापवावे. त्यानंतर दुधाचे तापमान 70 अंश से.पर्यंत कमी करावे. या तापमानावर दुधात एक किंवा दोन टक्के तीव्रता असलेले सायट्रिक आम्ल बारीक धारेने सोडावे. सायट्रिक आम्लाऐवजी लिंबाचासुद्धा उपयोग करता येतो. सायट्रिक आम्लामुळे दूध लगेच नासते. अशा फाटलेल्या किंवा नासलेल्या दुधातून बाहेर येणारे हिरवट निळसर पाणी जेव्हा दिसू लागेल, त्याक्षणी सायट्रिक आम्ल टाकणे बंद करावे. नंतर दुसऱ्या एका स्वच्छ पातेल्याच्या तोंडावर तलम किंवा मखमलीचे कापड बांधावे. त्यावर पहिल्या पातेल्यातील दूध ओतावे. कापडावर छन्ना (पाणी वगळता उरलेले घनपदार्थ) जमा होईल. वेगळा केलेला छन्ना लगेच लाकडी पेटीत (पनीर दाब पेटी) कापडासहित ठेवावा. त्यानंतर लाकडी पेटी वर हळूहळू 25 ते 30 किलोग्रॅम वजन 15 ते 20 मिनिटे ठेवावे. त्यानंतर तयार झालेले पनीर बाहेर काढून पाच ते आठ अंश से. तापमान असलेल्या थंड पाण्यात तीन ते चार तास ठेवावे. थंड पाण्यातून काढून लाकडी फळीवर पाणी निघण्यासाठी थोडा वेळ ठेवावे. म्हशीच्या दुधापासून (सरासरी स्निग्धांश सहा टक्के) दुधाच्या 20 ते 22 टक्के पनीर तयार होते. गाईच्या दुधापासून (सरासरी स्निग्धांश 3.5 ते 4 टक्के) सरासरी 16 ते 18 टक्के पनीर तयार होते, परंतु गाईच्या दुधापासून तयार केलेले पनीर मऊ असते, त्यामुळे त्या पनीरला बाजारात म्हशीच्या दुधापासून तयार केलेल्या पनीरच्या तुलनेत कमी मागणी असते.
लेखक – डॉ. रजिउद्दिन, 7588062558 – डॉ. खोडे, 9421727911 (लेखक पशुजन्य पदार्थ प्रौद्योगिकी विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि.लातूर येथे कार्यरत आहेत.)
आल्यापासून सुंठनिर्मितीची माहिती
आल्यापासून सुंठनिर्मितीची माहिती
भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. आल्याचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी आल्याचे कंद स्वच्छ धुऊन मातीपासून वेगळे करावेत आणि उन्हात चांगले वाळवावेत. आल्याच्या कंदापासून खारे आले, आलेपाक, आल्याचे सरबत, वाळलेले आले आणि आल्याचे लोणचे बनवितात. सुंठ तयार करावयास वापरावयाच्या आले पिकाची काढणी परिपक्व झाल्यानंतर करावी. ते पूर्ण वाढलेले, निरोगी असावे. सुंठीसाठी वापरायचे आले अधिक तंतुमय असू नये. रिओडी जानेरो, माहीम यांसारख्या कमी तंतुमय असणाऱ्या जातींचा वापर करावा. यापासून उत्तम प्रतीची सुंठ तयार होऊन चांगला बाजारभाव मिळतो.
सुंठ तयार करण्याच्या पद्धती
मलबार पद्धती
या पद्धतीत आले स्वच्छ निवडून आठ-दहा तास पाण्यात भिजत ठेवतात. त्यानंतर त्याची साल काढून दोन टक्के चुन्याच्या द्रावणात सहा-सात तास भिजत ठेवतात. त्यानंतर द्रावणातून काढून हे आले छोट्याशा व बंद खोलीत पसरून ठेवतात. बंद खोलीत आल्याच्या कंदाला 12 तास गंधकाची धुरी देतात. थोडक्यात, बंद खोलीत गंधक जळत ठेवतात. त्यानंतर कंद बाहेर काढून दोन टक्के चुन्याच्या द्रावणात सहा तास भिजत ठेवतात व परत 12 तास गंधकाची धुरी देतात. अशाप्रकारे ही प्रक्रिया तीन वेळा करावी लागते, त्यामुळे आल्याच्या कंदांस पांढराशुभ्र रंग येतो. हे प्रक्रिया केलेले आले सूर्यप्रकाशामध्ये वाळवले जाते व गोणपाटामध्ये घालून स्वच्छ केले जाते. हेच आले सुंठ म्हणून बाजारात पाठविले जाते.
सोडा व खास मिश्रण पद्धती
या पद्धतीने सुंठ तयार करण्यासाठी आले सर्वप्रथम स्वच्छ निवडून घ्यावे. त्यानंतर आठ ते दहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याची साल काढून घ्यावी. त्यानंतर दीड x दोन फूट आकाराच्या हाताने उचलेल इतक्या क्षमतेच्या गॅल्व्हनाइज्ड जाळीच्या पिंजऱ्यामध्ये आले भरून घ्यावे. तीन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये सोडिअम हायड्रॉक्साईड (कॉस्टिक सोडा)ची 20 टक्के, 25 टक्के आणि 50 टक्के तीव्रतेची द्रावणे तयार करून उकळून घ्यावीत. या द्रावणांमध्ये कंदाने भिजलेला पिंजरा 20 टक्के द्रावणामध्ये पाच मिनिटे, 25 टक्के द्रावणामध्ये एक मिनीट आणि 50 टक्के द्रावणामध्ये अर्धा मिनीट धरावा. त्यानंतर पिंजऱ्यातील आले चार टक्के सायट्रिक ऍसिडच्या द्रावणात दोन तास बुडवून ठेवावे. त्यानंतर चांगले निथळून स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळत घालावे. चांगले वाळल्यानंतर थोडीफार राहिलेली साल चोळून काढावी. अशा पद्धतीने चांगली सुंठ तयार होते. प्रक्रिया करण्यापूर्वी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
संपर्क – प्रा. हेमंत शिंदे, 9822615174 भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
ऑईस्टर मशरूमचे उत्पादन
ऑईस्टर मशरूमचे उत्पादन
हंगाम आणि विविधता
संपूर्ण वर्षभर लागवड घरांतर्गत असते आणि याला मशरूम गृहाची गरज असते. पांढरे ऑईस्टर (Co-1) आणि राखाडी रंगाचे ऑईस्टर (M-2) तामिळनाडुसाठी योग्य आहेत.मशरूम गृह16 स्क्वे.मी. चे शाकारलेले छप्पर आवश्यक आहे. स्पॉन रूम आणि पैदास गृह असे शेडचे विभाजन करा. स्पॉन रूम: 25-30 डि.से. तापमान राखा, वायुवीजन पुरवा, प्रकाशाची गरज नाही.पैदास/उपज गृह: 25-30 डि.से. तापमान राखा, 75-80 टक्केच्या वर RH,पुरेसा प्रकाश आणि वायुवीजन राखा.(डिजिटल थर्मामीटर आणि आर्द्रता मीटर बाजारात उपलब्ध आहेत)
स्पॉन (मशरूमचे बीजन) योग्य थर: ज्वार/चवळी/शलगम, बाजरी, गव्हासारखी धान्येस्पॉन तयार करणे: धान्ये अर्धवट शिजवा, वा-यावर वाळवा, कॅल्शियम कार्बोनेटच्या भुकटीत 2 टक्के प्रमाणात मिसळा, धान्ये ग्लुकोजच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरा, कापसाने बंद करा आणि कुकरमध्ये 2 तास निर्जंतुक करण्यासाठी ठेवा. बुरशीचे शुध्द कल्चर (शेती विभाग/शेती विश्वविद्यालयातील उत्पादन) घाला आणि खोलीच्या तापमानावर 15 दिवस ठेवा.
स्पॉनिंगसाठी 15 ते 18 दिवसांचे जुने स्पॉन वापरा.मशरूम बेड तयार करणेयोग्य थर: तांदूळ/गव्हाचे वाळलेले गवत/उसाचे वाळलेले अवशेष, ज्वारीचे वाळलेले तूस थर शिजविणे: 5 सें.मी.चे तुकडे करा, पाण्यात 5 तास भिजवा, पाणी एक तास उकळा, पाणी काढून टाका, वा-यावर 65 टक्के आर्द्रतेसह वाळवा (हातांनी पिळल्यावर पाणी निथळता कामा नये).पिशव्या तयार करणे:- 60 x 30 सें.मी. पॉलिथिनच्या पिशव्या (दोन्ही बाजू उघड्या).- पिशवीचे एक तोंड बांधा आणि मध्यभागी 1 सें.मी.व्यासाचे भोक पाडा. – पिशवीमध्ये 5 से.मी. उंचीवर शिजलेले वाळलेले गवत टाका; 25 ग्राम स्पॉन शिंपडा. – गवताचा 25 से;मी. उंचीचा थर घाला.
पुन्हा असेच करा आणि या प्रकारे स्पॉनचे चार थर आणि गवताचे पाच थर करा. – तोंड बांधून टाका आणि बेडचे टायर स्पॉन रनिंग रूममध्ये तयार करा. – 15-20 दिवसांनी, पिशव्यांची तोंड उघडा आणि हे बेड क्रॉपिंग रूममध्ये ठेवा. – थोड्या-थोड्या वेळाने पाणी शिंपडून हे बेड ओलसर ठेवा.कापणी मशरूमची टोके बेड उघडल्यानंतर तिस-या दिवशी दिसतात आणि 3 दिवसांनी पिकतात. पाणी शिंपडण्या आधी, परिपक्व मशरूमची कापणी रोज किंवा एक दिवसाआड करा.दुसरी व तिसरी कापणी पहिल्या व दुस-या कापणीनंतर बेडचे पृष्ठभाग खरवडून मिळवू शकता.
कवठापासून तयार करा जेली, जॅम
कवठापासून तयार करा जेली, जॅम
जेली
जेली तयार करण्यासाठी पूर्ण वाढ झालेली, मोठ्या आकाराची व अर्धवट पिकलेली कवठे घ्यावीत.
प्रथम ती स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यावीत. त्यानंतर ती फोडून स्टीलच्या सुरीने गर काढून घ्यावा.
स्टीलच्या पातेल्यामध्ये जेवढा गर तेवढेच पाणी मिसळून प्रतिकिलो गरास 1.5 ग्रॅम या प्रमाणात सायट्रिक आम्ल मिसळावे.
पातेले शेगडीवरती मंद आचेवर ठेवावे. मिश्रण शिजवत असताना ते पातेल्यास चिकटू नये यासाठी ते अधूनमधून पळीने हलवत राहावे.
मिश्रणास उकळी आल्यानंतर ते अर्धा तास शिजवावे. नंतर पातेले खाली उतरून मिश्रण थंड झाल्यानंतर थोडे थोडे मलमल कापडावर टाकून हाताने हळुवारपणे दाबून त्याचा रस काढावा.
फडक्यात राहिलेला चोथा वेगळा करावा. गाळून घेतलेला रस स्टीलच्या उभट भांड्यामध्ये एकत्र करून तो 24 तास एका ठिकाणी स्थिर ठेवावा.
दुसऱ्या दिवशी उभट भांडे हळुवारपणे तिरके करून निवडलेला रस दुसऱ्या स्टीलच्या भांड्यात काढून घ्यावा. भांड्याच्या तळाला साठलेला साका रसात येणार नाही याची काळजी घ्यावी.
निवळलेला रस जेली तयार करण्यासाठी वापरावा.
जेली तयार करण्यासाठी पेक्टिनचे परीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रसातील पेक्टिनच्या प्रतीवरून त्यासाठी वापरावयाचे साखरेचे प्रमाण ठरवावे.
काचेच्या पेल्यात एक चमचा रस घेऊन त्यामध्ये दीड चमचा मिथिलेटेड अल्कोहोल (रेक्टिफाईड स्पिरिट) मिसळून मिश्रण हलवावे. थोड्या वेळाने त्याचे परीक्षण करावे.
मिश्रणाची एकच घट्ट गुठळी तयार झाल्यास अशा रसामध्ये पेक्टिनचे प्रमाण आहे असे समजावे. अशा रसासाठी एकास एक साखरेचे प्रमाण वापरावे. जर मिश्रणामध्ये लहान गुठळ्या झाल्या, तर त्यामध्ये पेक्टिनचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे असते.
घटक पदार्थांचे प्रमाण
साहित्य कवठाचा रस – 1 लिटर, साखर- मध्यम पेक्टिन- 750 ग्रॅम, जास्त पेक्टिन- एक किलो. कृती
स्टीलच्या पातेल्यामध्ये रस मोजून घ्यावा. वापरावयाची साखर वजन करून त्यामध्ये मिसळावी. साखर पळीच्या सहायाने हलवून शक्य होईल तेवढी विरघळवून घ्यावी.
नंतर पातेले शेगडीवर मंद आचेवर ठेवावे. मिश्रणातील साखर पूर्ण विरघळेपर्यंत पळीने सतत हलवावे. हे मिश्रण उकळी येईपर्यंत शिजवावे.
मिश्रणाचे तापमान 105 अंश सेल्सिअस आल्यावर त्याचे परीक्षण करावे. यासाठी एका चमच्यामध्ये थोडी जेली घेऊन ती थोडी थंड झाल्यानंतर चमचा हळूवारपणे तिरपा करावा. मिश्रण एकसंघ खाली पडले तर जेली तयार झाली असे समजावे किंवा मिश्रणाचा ब्रिक्स 70 डिग्री आल्यास जेली तयार झाली असे समजून शेगडीवरून पातेले खाली उतरून घ्यावे.
पातेले दोन ते तीन मिनिटे स्थिर ठेवावे. या कालावधीत जेलीवर आलेली मळी स्टील झाऱ्याने अलगद काढून टाकावी.
निर्जंतुक केलेल्या बाटल्यामध्ये जेली भरून पूर्ण थंड होईपर्यंत त्या उघड्यावर ठेवाव्यात. त्यांना निर्जंतुक केलेली झाकणे बसवावीत. बाटल्या हवाबंद करून त्यांची साठवण थंड व कोरड्या ठिकाणी करावी.
जॅम
जॅम करण्यासाठी पूर्ण पिकलेली मोठ्या आकाराची कवठे घ्यावीत. कवठ फोडून स्टीलच्या सुरीने गर काढून घ्यावा.
एका पातेल्यामध्ये एक किलो गरास 200 मि.लि. पाणी मिसळून गर हाताने कुस्करून लगदा करावा.
लगदा स्टीलच्या चाळणीत घेऊन तो हाताने दाबून त्याचा गर पातेल्यात काढून घ्यावा. तयार गर जॅम करण्यासाठी वापरावा.
जॅम करण्यासाठी पातेल्यामध्ये गर आणि साखर एकत्र करून शेगडीवर ठेवावे.
पहिल्या उकळीनंतर त्यात सायट्रिक ऍसिड मिसळावे.
गर घट्ट होत आल्यानंतर त्याचा ब्रिक्स मोजावा. 68 डिग्री ब्रिक्स येईपर्यंत जॅम शिजवावा.
जॅम घरी तयार करत असताना एका प्लेटमध्ये पाणी घेऊन शिजवलेले मिश्रण चमच्याने थोडे घेऊन पाण्यामध्ये टाकावे.
जर मिश्रण पाण्यामध्ये पसरले तर अजून शिजविण्याची गरज आहे असे समजावे. जर मिश्रण न पसरता गोळी तयार झाली तर जाम तयार झाला असे समजावे.
तयार जॅम निर्जंतुक केलेल्या बाटल्यात भरावा. जॅमची दीर्घकाळ साठवण करायची असल्यास जॅमवर वितळलेल्या मेणाचा पातळ थर देऊन झाकण घट्ट लावावे.
कांडीकोळसा
कांडीकोळसा
कापसाच्या पऱ्हाट्यापासून तयार करा कांडीकोळसा
कापूस वेचणी झाल्यावर शेतकऱ्यांपुढील सर्वांत मोठा प्रश्न हा पऱ्हाट्यांचा असतो. अनेकजण या पऱ्हाट्या इंधन म्हणून वापरतात किंवा शेतात जाळून टाकतात. शेताच्या कडेला पऱ्हाट्या साठवल्या तर त्यावरील कीड व रोगाचा प्रादुर्भाव पुढील हंगामातील पिकामध्ये होऊ शकतो. अशा पऱ्हाट्यांपासून कांडीकोळसा तयार करून वाया जाणाऱ्या पऱ्हाट्यांवर उत्तर शोधता येते. एका एकरामध्ये सहा क्विंटल पऱ्हाट्या मिळतात. या पऱ्हाट्या वापरून किमान चार ते पाच महिने कांडीकोळसा तयार करता येतो. याव्यतिरिक्त इतर पिकांच्या काडीकचऱ्याचाही वापर करून वर्षभर कांडीकोळसा उद्योग चालवता येणे शक्य आहे.
कांडीकोळसा प्रक्रिया तंत्रज्ञान
भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेतील तज्ज्ञांनी शेतातील काडीकचरा वापरून कांडीकोळसा तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामध्ये कोळसा तयार करण्यासाठी लागणारी भट्टी तसेच कांडीकोळसा बनविण्याचे यंत्र आणि चूल तयार केली आहे.
कोळसा तयार करण्याची भट्टी :
ही एक लोखंडी पिंपासारखी भट्टी असून, तिला मधोमध एक झडप असते. कोळसा तयार करण्यासाठी यात पऱ्हाट्या बारीक करून आतमध्ये टाकतात. निम्म्यापेक्षा जास्त भरल्यावर तो पेटवून देऊन झडप बंद करतात. त्यामुळे भट्टीत जितका ऑक्सिजन आहे, तोपर्यंत पऱ्हाट्या जळून कोळसा तयार होतो. म्हणजेच ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा केला तर कोळसा तयार होतो. भट्टी पेटवल्यानंतर पाच तासांनी झडप उघडून कोळसा बाहेर काढावा. —————— एकूण लांबी +1100 मि.मी. एकूण व्यास +800 मि.मी. क्षमता कि./दिवस +80 कि.ग्रॅ. रूपांतर क्षमता +40 टक्के मजूर +2 ——————–
कांडी कोळसा तयार करण्याचे यंत्र :
भट्टीत तयार झालेल्या कोळसा शेणामध्ये कालवून हे मिश्रण यंत्रामध्ये टाकतात. हे यंत्र स्क्रू प्रेस तंत्रज्ञानावर चालते. कोळसा व शेण एकत्र केलेले मिश्रण स्क्रूच्या साह्याने यंत्रामध्ये पुढे ढकलले जाते. यंत्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या गोलाकार नळीतून प्रेस होऊन कांडी कोळसा बाहेर येतो. मानके ——————- क्षमता +60-65 कि./ता. रूपांतरण क्षमता +85 टक्के मजूर +2 ——————
चूल :
तयार झालेला कांडीकोळसा हा आपण चुलीत जाळू शकतो; परंतु तो एकूण क्षमतेने जाळावा व जास्त उष्णता प्राप्त करून घेण्यासाठी विशिष्ट चूल तयार करण्यात आली आहे. या चुलीमध्ये दोन जाळ्या बसवलेल्या असून, त्या जाळ्यांमध्ये हा कोळसा भरतात. या चुलीखाली कागद पेटवून ठेवतात. त्यामुळे कोळसा पेट घेतो. कोळसा पेटल्यावर लाल निळसर रंगाची ज्योत मिळते. चार माणसांचा स्वयंपाक बनविण्यासाठी सरासरी 400 ते 500 ग्रॅम कोळसा लागतो. —————— एकूण आकारमान मि.मी. +230 x 145 वजन +2 कि.ग्रॅ. क्षमता +400-500 ग्रॅम कार्यक्षमता +23-25 टक्के ———————
फायदे :
1) पऱ्हाट्यांची योग्यरीत्या विल्हेवाट लावता येते. 2) कापसाच्या पऱ्हाट्या जाळल्याने होणारे वायूप्रदूषण कमी करता येते. 3) स्वस्त, सोपे आणि पर्यावरणासाठी हानिकारक नसलेले जैविक इंधन ग्रामीण भागात सहज तयार करता येते. 4) ग्रामीण भागात रोजगाराची संधी. ———————
वेगवेगळ्या राज्यातील अनेक मिठाया, उदा.- खवा जिलबी, पयासम, कुल्फी, पंतुआ, लालमोहन, कलाकंद अजूनही अनेक भागांतील लोकांना माहीत नाहीत. असे पदार्थ जेथे प्रचलित नाहीत, तेथे “नवीन’ पदार्थ म्हणून विकता येतील किंवा या पदार्थांत स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करून एखादा वेगळा पदार्थ ग्राहकांना देता येईल. तसेच चांगले, पौष्टिक, पारंपरिक दुग्धपदार्थ टिकून राहतील.
भारतातील अनेक राज्यांत विविध भागांत दुधापासूनच्या अनेक प्रकारच्या मिठाई प्रसिद्ध आहेत. या काही मिठाई त्या त्या भागात प्रसिद्ध असून, त्या संपूर्ण भारतात क्वचितच लोकप्रिय आहेत. हा एक मोठा पारंपरिक खजिनाच आपल्या जवळ आहे. अशा काही मिठाया, उदा. दक्षिण भारतातले पयासम (त्याचे प्रकार उदा. पलाड पयासम, खसखस पयासम, विविध डाळींपासूनचे पयासम), दहीभात, कढी, कलान इत्यादी पदार्थ. उत्तर भारतातील पूर्व राज्यांतील अनेक मिठाया, मिष्टी दही किंवा छन्नापासून बनविण्यात येणारा राजभोग, चमचम, संदेश, छन्ना मुरकी, खीरमोहन इत्यादी मिठाया अजूनही अनेक भागांतील लोकांना माहीत नाहीत. तसेच गुलाबजामूनसारखेच असणारे, परंतु थोडे वेगळे प्रकार उदा. पंतुआ, लालमोहन, कालाजामून, खवा जिलबी, छन्ना जिलेबी, छन्नाबारा, सीताभोग इत्यादी पदार्थ, ओडिशात प्रचलित असलेला छन्ना पोडो, कर्नाटकात खव्यासारखाच, पण थोडा वेगळा पदार्थ कुंदा, इत्यादी अनेक दुग्धपदार्थांची तोंडओळख होणे गरजेचे आहे. वरील सर्व पदार्थ जेथे प्रचलित नाहीत, तेथे “नवीन’ पदार्थ म्हणून विकता येतील किंवा वरील पदार्थांत स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करून एखादा वेगळा पदार्थ ग्राहकांना देता येईल. असे झाल्यास अनेक प्रकारचे वैविध्य जपता येईल व चांगले, पौष्टिक, पारंपरिक दुग्धपदार्थ टिकून राहतील.
खवा जिलेबी
जिलेबी हा सर्व स्तरांतील लोकांना ज्ञात असलेला, वेगवेगळ्या प्रसंगी खाल्ला जाणारा पदार्थ आहे. कमी किमतीतील गोड, खुसखुशीत अंगबांधणी असलेला पदार्थ बहुतांशी सगळ्यांना आवडतो. खवा जिलेबी महाराष्ट्रातील अनेक शहरांत बनवली जाते. दोन किंवा चार वेटोळे असलेली, तपकिरी रंगाची, (किंचित) ओलसर अशी असते.
खवा जिलेबीसाठी खवा थोडा ओलसर करून घेतात.
त्यात कधी कधी थोडे तूप घालून खवा आणखी मऊ करून घेतात.
खवा जिलेबीसाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे घट्ट, सैलसर मिश्रण यासाठी खवा, अरारूट पावडर आणि टोकीर पावडर घेऊन वरील मिश्रण बनवतात.
काही हलवाई थोडे दही आणि साखरही टाकतात. खवा हा मुख्य कच्चा माल म्हणून व अरारूट पावडर इतर घटकांना बांधून ठेवणारा पदार्थ म्हणून, तर टोकीर पावडर साखरेचा पाक जिलबीमध्ये धरून ठेवण्यास मदत करतो.
खवा एकजीव करून मऊ करून घेणे थोडे तूप घालून खवा मऊ करून घेणे अरारूट पावडर टाकणे मळणे टोकीर पावडर पेस्ट करून टाकणे मळणे, एकत्र करणे, ——–घट्ट, सैलसर मिश्रण तयार करणे छिद्र असलेल्या कापडातून जिलेबी मिश्रण तुपात तळण्यासाठी सोडणे साखरेच्या पाकात जिलेबी टाकणे
पयासम :
दक्षिण भारतातील हा पारंपरिक दुग्धपदार्थ असून, तो लग्न, सण, विविध समारंभांदरम्यान तयार केला जात असतो.
बनवण्याच्या पारंपरिक पद्धतीनुसार, भागानुसार पयासमचे बरेच प्रकार आहेत. त्यामुळे यातील घटकांच्या प्रमाणात खूप तफावत आहे. एकूण घनता 30.9 ते 51.9 टक्के इतकी, तर सुक्रोज 17.7 ते 32 टक्के आढळते.
पयासम 25-30 अंश सेल्सिअस तापमानास एक ते दोन दिवसच टिकू शकते.
पाश्चराईझ केलेले टोन्ड दुधामध्ये (तीन टक्के फॅट आणि आठ टक्के एस.एन.एफ.) साखर टाकून आटवून घेतले जाते.
तांदळापासून बनविलेले लहान तुकडे (फ्लेक्स) 90 अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात दहा मिनिटे ठेवून नंतर धुऊन घेतात. गरम करून पाऊचमध्ये आटविलेल्या दुधासकट भरतात.
कुल्फी :
कुल्फी हा दुग्धपदार्थ उन्हाळ्यात सर्व स्तरांतील लोकांमध्ये आवडता आहे. उन्हाळ्यात कुल्फीचा खप मोठ्या प्रमाणात वाढतो. काही प्रेक्षणीय स्थळांवर कुल्फीला वर्षभर मागणी असते.
कृती :
दूध (चार टक्के फॅट आणि 20 टक्के एस.एन.एफ.) साखर टाकणे (दुधाच्या सहा टक्के) स्टॅबिलायझर आणि इमल्सिफायर (0.5 टक्का) टाकणे पाश्चराईझ करणे (80 अंश से.तापमानाला 25 सेकंदांपेक्षा जास्त वेळ) आटवणे (50 टक्के) थंड करणे आणि एजिंग करणे (दोन ते चार तास, 15 ते 20 अंश से.) रंग व सुगंध टाकणे (कोनमध्ये भरतेवेळी) कोन भरणे व गव्हाच्या पिठाने बंद करणे फ्रीजिंग आणि हार्डनिंग करणे (4ः1 या प्रमाणात बर्फ व मिठाचे मिश्रण) कुल्फी तयार होते
कुल्फीमध्ये काजू, बदामाचे काप, रंग, सुगंध टाकून त्याची आकर्षकता वाढवता येईल. फळांचा गर, रसाचादेखील वापर करता येईल.
पंतुआ :
मूळचा भारताच्या पूर्व भागातून आलेला हा पदार्थ आहे. पंतुआ ही मिठाई जवळपास गुलाबजामून सारखीच बनवतात.
पंतुआसाठी खवा (40 टक्के आर्द्रता) आणि छन्ना (58 टक्के आर्द्रता), मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र करून कणीक बनवतात. या पुढील कृती गुलाबजामून बनवताना करतात तशीच करतात.
पंतुआ बनवताना दुसऱ्या पद्धतीत छन्ना (50 टक्के), खवा (40 टक्के), मैदा (तीन टक्के), अरारूट पावडर (तीन टक्के), रवा (तीन टक्के), पिठीसाखर (0.6 टक्का) आणि बेकिंग पावडर (0.3 टक्का) घेऊन, एकत्र करून मळून कणीक बनवतात.
या कणकेपासून 12 ग्रॅम वजनाचे गोळे (गोलाकार) बनवून तुपातून तळून घेतात. जेव्हा गोळे तांबड्या रंगाचे होतात, त्यानंतर हे गोळे साखरेच्या पाकात (60 अंश से.) टाकतात.
पंतुआ या मिठाईची अंगबांधणी ही गुलाबजामूनपेक्षा मऊ असते. खव्याच्या जागी मऊ छन्ना टाकल्यामुळे पंतुआची अंगबांधणी मऊ होते.
लालमोहन :
गुलाबजामूनसारखाच हा पदार्थ आहे; परंतु हा खव्यापासून न बनवता छन्नापासून बनवतात.
लालमोहन या मिठाईचा रंग हा हलकासा तांबूस असतो.
या मिठाईत छन्ना, दोन-तीन टक्के गव्हाच्या पिठाबरोबर मळून घेऊन कणीक बनवतात.
कणकेपासून लहान गोळे बनवून तुपातून तळून घेतात. हलकासा तांबूस रंग येईपर्यंत लालमोहन तळतात.
यानंतर हे गोळे 60 टक्के साखरेच्या पाकात काही तास मुरण्यासाठी ठेवून देतात.
पंतुआतील घटक :
एकूण घनता – 59.7 टक्के फॅट – 15.5 टक्के प्रथिने – 8.7 टक्के ऍश (राख) – 0.67 टक्के सुक्रोज – 27.1
कलाकंद :
किंचित गोड आंबट अशी मिश्रित चव असणारा अस्सल देशी पदार्थ आजही ग्रामीण भागात आपला प्रभाव टिकवून आहे. दूध उकळावे दूध जवळपास अर्धे आटवल्यानंतर दुधात सायट्रिक ऍसिड टाकणे (0.1 टक्का) दूध कढईत ढवळणे दूध थोड्या प्रमाणात साकळेल दूध कढईला लागू न देता उकळणे साखर टाकणे (दुधाच्या सात टक्के) दाणेदार खव्यासारखे घट्ट ओलसर अंगबांधणी झाल्यावर गॅस बंद करावा थोडे तूप पसरवलेल्या ताटात कलाकंद पसरवून घ्यावे काजू, बदाम काप, चांदीचा वर्ख लावणे
(टीप : दूध उकळल्यानंतर सायट्रिक ऍसिड टाकल्यास शेवटी कलाकंद ओलसर दिसते. म्हणून दूध थोडे आटविल्यानंतर सायट्रिक ऍसिड टाकल्यास कलाकंदची अंगबांधणी उत्तम व चांगली होते.)
संपर्क: डॉ. धीरज कंखरे, 9405794668 (लेखक कृषी महाविद्यालय, धुळे येथे कार्यरत आहेत.)
केळी-खोडापासून धागे
केळी-खोडापासून धागे
केळीचा घड काढल्यानंतर केळीच्या खोडापासून धागानिर्मिती करणे शक्य आहे. त्यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळू शकेल.
केळीचे खोड लवकर कुजत नसल्यामुळे आंतरमशागतीसाठी अडचणी येतात. मात्र, खोडापासून धागानिर्मितीमुळे ही अडचण दूर होण्यासोबत उत्पन्नही मिळू शकते.
केळी खोडापासून धागानिर्मितीसाठी आवश्यक बाबी
केळी खोडापासून धागा काढणारे यंत्र
कापलेल्या केळीझाडांचे खोड
तीन पुरुष मजूर व २ स्त्री मजूर प्रतिदिवस
विद्युत पुरवठा
केळी खोडापासून धागानिर्मितीची प्रक्रिया
केळी खोडापासून उत्कृष्ट प्रतीचा धागा काढण्यासाठी लाल केळी, नेंद्रन, रस्थाली ह्या जातींचा वापर करतात. महाराष्ट्रात लागवडीखाली असलेल्या अर्धापुरी, ग्रॅन्ड नैन, श्रीमंती, महालक्ष्मी ह्या जातींपासूनही चांगल्या प्रतीचा धागा काढता येतो. धागा काढण्यासाठी फक्त खोडाचाच वापर करता येतो असे नाही, तर घडाच्या दांड्याचा तसेच पानाच्या शिरेचाही करता येतो. परंतु, आर्थिकदृष्ट्या किफायतशीर धागा फक्त खोडापासून बनू शकतो. धागा काढण्यासाठी खोडाचा वापर झाड कापल्यापासून चोवीस तासांच्या आत करावा.
धागा काढणीसाठी तीन माणसांची गरज असते. एक माणूस खोड उभे चिरून त्याचे चार तुकडे करतो. त्यासाठी गुजरात येथील नवसारी कृषी विद्यापीठामध्ये केळीचे खोड कापणी यंत्र तयार केले आहे. हे यंत्र खोडाचे दोन ते चार उभे काप करते. दुसरी व्यक्ती प्रत्यक्ष यंत्रावर धागा काढणीचे काम करते. तिसरी व्यक्ती काढलेला धागा पिळण्याची प्रक्रिया करून धागा दोरीवर वाळत घालते. तसेच प्रक्रियेदरम्यान निघालेले पाणी व लगदा वेगळे करते. दोन स्त्री मजुरांचा वापर सहाय्यक म्हणून होतो.
सुकवलेला धागा मोठ्या दाताच्या फणीने विंचरून घेतल्यास धाग्याची प्रत चांगली मिळते. कुशल कारागीराद्वारे आठ तासांमध्ये २० ते २५ किलो धागा मिळू शकतो. या यंत्राची किंमत अश्वशक्तीनुसार ७० हजार ते १ लाख ७५ हजार रुपये अशी असते. केळी खोडापासून काढलेला धागा एकूण ३ (पहिली, दुसरी व तिसरी) प्रतीत विभागला जातो. यंत्रामधून काढलेले सूत सहसा तिसऱ्या प्रतवारीचे असते. त्याला विंचरून घेतल्यास ते दुसऱ्या प्रतिपर्यंत जाऊ शकते. त्यानंतर लाकडी पाटीने त्यास पॉलिश करून पांढरे शुभ्र झाल्यास पहिल्या प्रतिपर्यंत जाऊ शकते.
धाग्याचा दर
पांढरा शुभ्र धागा – १०० ते १२० प्रतिकिलो
सिल्व्हर शाईन धागा – ८० ते १०० प्रतिकिलो
पिग्मेंट युक्त धागा – ८० रु. किलो
धाग्याची उपयुक्तता
धाग्यापासून बारीक दोरी, दोरखंड, पिशव्या, पाय पुसणी, चटई, आकर्षक टोप्या, कापड, साड्या, शोभेच्या वस्तू, क्राफ्ट पेपर, टिश्यू पेपर, फिल्टर पेपर, पृष्ठ, फाईलसाठी जाड कागद, सुटकेस, डिनरसेट, बुटांचे सोल, चप्पल इत्यादी वस्तू बनविता येतात.
केळी खोडापासून धागा निर्मितीचे फायदे
केळी बागेतील न कुजणारे अवशेष जाळले जातात. त्यामुळे पर्यावरणाच्या ऱ्हासासोबतच जमिनीतील उपयुक्त जिवाणूही नष्ट होतात. त्याचा फटका उत्पादकतेला बसतो.
दुष्काळामध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे घडनिर्मिती न झाल्यास उर्वरीत उभ्या खोडापासून काही प्रमाणात आर्थिक लाभ होऊ शकतो.
केळी खोडापासून धागेनिर्मिती यंत्र व कार्यपद्धती
या यंत्रात दोन रिजिड पाइप बसवले असून, गायडिंग रोलर असतात. या रोलरमुळे केळी खोड आत सरकते. खोडाच्या आकारमानानुसार दोन रिजिड पाइपमधील अंतर कमी-जास्त करता येते. रोलर फिरविण्यासाठी बेल्ट पुली यंत्रणा बसवलेली असते. यासाठी एक एचपी क्षमतेची सिंगल फेज विद्युत मोटर पुरेशी होते.
यंत्राच्या दुसऱ्या बाजूने निघालेले धागे पिळून त्यातील पाणी बाहेर काढले जाते. धागे तारांवर एक दिवस वाळवतात. कोरड्या धाग्यांमध्ये विशिष्ठ प्रकारची फणी फिरवून ते एकमेकांपासून वेगळे करतात.
शेतातून खोडाची वाहतूक, उभे चिरून त्याचे चार तुकडे करणे, यंत्रात भरणे व धागे पिळून काढणे या कामांसाठी पुरुष मजूर लागतात. धाग्यांतून फणी फिरविणे, ते वाळत घालणे या कामांसाठी महिला मजूर लागतात.
केळीपासून स्वादिष्ट पदार्थ
केळीपासून स्वादिष्ट पदार्थ
केळी हे शक्तिवर्धक व स्वस्त फळ आहे. त्यामध्ये साखर, प्रथिने, स्निग्धांशाचे प्रमाण जास्त आहे. चुना, लोह, स्फुरद ही खनिजे आणि क व अ ही जीवनसत्चे केळीमध्ये आहेत. केळी हे पचायला सोपे फळ असून त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. केळीच्या फळाचे अनेक टिकाऊ पदार्थ व लगेच खाण्याचे पदार्थ तयार होऊ शकतात. हे पदार्थ
विविध घरगुती पदार्थ
चिप्प्स
पूर्ण वाढ झालेली १० टक्के परिपक अशी केळी निवडावीत. ही केळी स्वच्छ पाण्याने धुऊन किंवा ओल्या स्वच्छ फडक्याने पुसून घ्यावीत. स्टीलच्या चाकूने फळांची साल काढावी. केळी सोलण्याचे मशीन विकसित करण्यात आले आहे. या मशीनची ताशी ४५० (८० टक्के परिपक्र असलेली) केळी एका दिवसात सोलण्याची क्षमता आहे. मशीनच्या सहाय्याने ०.३ ते ०.५ मि.मी. जाडीच्या चकत्या कापान्यात. मशीन उपलब्ध नसल्यास स्टीलच्या चाकूने गोल, पातळ काप करावेत. साध्या चाकूने काप केल्यास ते काळे पडतात. काप काळसर पडून नयेत व ते पांढरेशुभ्र होण्यासाठी ०.१ टका सायट्रिक अॅसिड किंवा पोटेंशियम मेटबाय सल्फाइडच्या द्रावणात १५ ते २० मिनिटे बुड़नून ठेवावेत.
नंतर चकत्या उकळत्या पाण्थात ४ ते ५ मिनिटे थंड करून प्रतिकेिली चकत्यास ४ ग्रॅम या प्रमाणात गंधक घेऊन त्याची धुरी द्याची. या चकत्या उन्हात किंवा ड्रायरमध्ये सुकवाव्यात. जर ड्रायरमध्ये चकत्या सुकवायच्या असतील, तर ड्रायरमधील तापमान ५० ते ५५ अंश एवढे ठेवावे. चकत्या ह्याताने दाबल्या असता मोडल्यास त्या तयार झाल्या आहेत, असे समजाचे व सुकविण्याचे काम थांबवावे. विक्रीसाठी केिंचा जास्त दिवस टिकविण्यासाठी है वेफर्स हाथ डेन्सिटी पॉलिथीन पिशव्यात घालून हवाबंद डब्यात साठवाव्यात.
भुकटी
केळीच्या भुकटीला परदेशात भरपूर मागणी आहे. यापासून आपणास परकीय चलनही मिळू शकते. यासाठी पूर्ण पिकलेली केळी वापरतात. प्रथम केळी स्वच्छ पाण्याने धुऊन घेतात. केळीची साल काढून पल्पर यंत्राच्या सहाय्याने लगदा करून घेतात. केळीच्या गराच्या लगद्याची भुकटी स्प्रे ड्रायर किंवा ड्रम ड्रायर किंचा फोम मेंट ड्रायरच्या सहाय्याने करतात. तयार झालेली भुकटी निर्जतुक हवाबंद डब्यात साठवून कोरड्या व थंड जागी साठवितात. त्याचा वापर लहान मुलांच्या आहारात केला जातो. बिस्किटे व बेकरीमध्ये तसेच आइस्क्रोममध्ये केळीच्या भुकटीचा वापर केला जातो.
पीठ
केळीचे पीठ तयार करण्यासाठी कच्ची केळी वापरली जातात.
एक केिलो पीठ तयार करण्यासाठी साधारणपणे साडेतीन केिली गर लागतो. यासाठी प्रथम केळी स्वच्छ पाण्याने धुऊन, साल काढून त्याच्या चकत्या किंवा बारीक तुकडे करून सुकवतात. सुकविण्यासाठी सूर्याच्या उष्णतेचा किंवा वाळवणी यंत्राचा वापर करतात. केळीच्या चकत्या वाळवून त्याच्यातील पाण्याचे प्रमाण आठ टक्क्यांपेक्षाही कमी आणले जाते. नंतर या चकत्यांपासून दळणी यंत्राचा वापर करून पीठ तयार करतात. हे पीठ जर काळे पडत असेल, तर पोटॅशिअम मेटाबाथसल्फाईडच्या 0.०५ तें 0.0६ टका तीव्रतेच्या द्रावणात ३० ते ४५ मिनिटे केळ्याच्या चकत्या बुडवून वाळवतात व नंतर पीठ तयार करतात. तयार झालेले पीठ प्लॅस्टिकच्या पिशव्यांत भरून कोरड्या व थंड जागी साठवितात. केळीच्या पिठामध्ये ७o ते ८० टक्के स्टार्च असतें. त्याचप्रमाणे शैव, चकली, गुलाबजाम इत्यादी उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.
जेली
५० टक्के पक्र फळाचा गर पाण्यात एकजीव करून १५ ते २0 मिनिटे गरम करावा. गरगाळून घ्यावा. गाळलेल्या गरात समप्रमाणात साखर, ०.५ टक्के सायट्रेिक आम्ल व पेक्टीन टाकून उकळी येईपर्यंत शिजवावे. या वेळी मिश्रणाचे तापमान साधारणपणे १०४ अंश से.असते. तयार जेलीमध्ये एकूण घन पदार्थाचे प्रमाण ७० डिग्री ब्रिक्स इतके असते. जेली गरम असतानाच निर्जतुक बाटल्यांमध्ये भरावी. पेरूच्या जेलीपेक्षा केळीची जेली पारदर्शक व स्वादिष्ट असते.
जॅम
कोणत्याही जातीच्या पूर्ण पिकलेल्या केळीचा वापर जॅम तयार करण्यासाठी करता येतो. गराच्या वजनाएवढी साखर मिसळून गर मंद अग्रीवर शिजवावा. साखर पूर्णपणे विरघळल्यावर ०.५ टक्के पेक्टीन, ०.३ टक्के सायट्रेिक आम्ल व रंग टाकून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे. मिश्रणाचा ब्रिक्स ६८ ते ७0 डिग्री झाल्यावर जॅम तयार झाला, असे समजावे. तयार जॅम कोरड्या व निर्जतुक बाटल्यांमध्ये भरावा. ह्या पदार्थ एक वर्षापर्यंत टिकू शकतो.
बनाना प्युरी
प्युरी म्हणजे पिकलेल्या ताज्या फळातील गर, रुस किंवा लगद्यावर विशिष्ट प्रक्रिया करुन सॉसप्रमाणे त्याचे स्वरुप बदलवले जाते. त्यामध्ये ताज्या फळांचा मूळ स्वाद, रंग, सुगंध कायम राहील, याची दक्षता घेतली जाते. प्युरीचा वापर मिल्कशेक, आइस्क्रीम, फळांचा रस इत्यादी विविध पदार्थात केला जातो. पिकलेल्या केळ्याचा गर पल्पर मशीनमधून काढून लगदा हवाविरहित करतात व निर्जतुकीकरण करून हवाबंद डब्यात भरुन ठेवतात. गर टिकविण्यासाठी त्यात कोणत्याही प्रकारच्या रसायनाचा अथवा साखरेचा वापर केला जात नाही. हे निर्याताभिमुख उत्पादन एका वर्षापर्यंत साठवून ठेवता येते.
कच्च्या केळीचे वडे
वडे बनविण्यासाठी ४-५ कची केळी, ४ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, मोहरी, मीठ, तेल लागते. वडे बनविताना प्रथम केळी सोलून लहान तुकडे करून पाणी न घालता वाफवून घेऊन त्यामध्ये लगदा परतावा. गार झाल्यावर हिरव्या मिरच्या व आले जाडसर वाटून घाला. बटाटेवडे बनविताना डाळीचे पीठ भिजवतो त्याप्रमाणे भिजवा. केळाच्या मिश्रणाचे वडे बनवून बेसनात बुडवून तळून घ्या. तयार झालेले वडे खोब-याच्या चटणीबरोबर खाण्यास वापरावे.
ज्यूस
या प्रक्रियेत पूर्ण पक्र केळ्याचा पल्पर मशीनचे गर काढतात. गर घट्ट असल्याने सर्वसाधारण स्वरुपात रस काढता येत नाही. त्याकरिता पाच मि.लि. प्रतिकिलो या प्रमाणात पेक्टीनेज एन्झाइम मिसळून दोन तास ठेवल्यानंतर स्वच्छ रस सहज मिळतो. या रसाची गोडी २४ ते २६ डिग्री ब्रिक्स असते. या रसात दीड पट पाणी मिसळून, आवश्यकतेनुसार सायट्रिक आम्ल टाकून आरटीएस बनविता येते. त्याची गोडी १५ डिग्री ब्रिक्स व आम्लता o.३ टक्के असते. हे पेय ८५ अंश से. तापमानाला पाश्चराइज्ड करून निर्जतुक बाटल्यांमध्ये भरावे. हा पदार्थ सहा महिन्यांपर्यंत टिकू शकतो. केळीपासून ८८ टक्के रसाचे प्रमाण मिळते.
केळ्याचे सुके अंजीर
पूर्ण पिकलेली केळी सोलून, पोटॅशियम मेटाबायसल्फाईडच्या १ टक्के द्रावणात बुडवून घ्या. नंतर त्याचे २.५ मि.मी. काप बनवून उन्हात वाळवा किंवा ५० अंश से. तापमानाला २४ तास ओव्हनमध्ये किंवा ड्रायरमध्ये ठेवून वाळवा. पॉलिथीनच्या पेिशव्यांमध्ये हवाबंद करून ठेवल्यास ४ ते ६ महिने सहज टिकतात. सुक्या अंजिराप्रमाणे ही अंजीर अत्यंत चविष्ट लागतात.
केळी बिस्कीट
केळी पिठात ३० टक्के मैदा मिसळून त्यामध्ये साखर, वनस्पती, तूप, बेकिंग पावडर, दूध पावडर, इसेन्स गरजेप्रमाणे मिसळ. योग्य प्रमाणात पाणी घेऊन त्याचा लगदा करा. हा लगदा साच्यात टाकून ओव्हनमध्ये ठेवून द्या. ही बिस्किटे अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असतात.
व्हिनेगर
अतिपक्र व खाण्यास योग्य नसलेल्या केळीपासून व्हिनेगर तयार करता येतो. केळीचा गर पाण्यात मिसळून घ्यावा. त्यात यीस्ट टाकून ४८ तास मिश्रण स्थिर ठेवा. त्यात माल्ट व्हिनेगरचे मुरवण २o ते ३o मि.लि. प्रति लिटर या प्रमाणात मिसळावे. हे मिश्रण ३o अंश से.तापमानात आांबवण्यास ठेवावे. ही रासायनिक किंवा (अॅसिडीफिकेशन) दोन ते तीन अठवड्यात पूर्ण होते. नंतर सेंट्रेिफ्यूज करून व्हिनेगर वेगळे करतात व निर्जतुक केलेल्या स्वच्छ बाटल्यांत भरून हवाबंद साठवितात
कच्च्या केळीची भाजी
भाजीची ३ कची केळी, ३-४ हिरव्या मिरच्या, १ नारळ, ५-६ छोटे कांदे, १ चमचा जिरे, २ कडीलिंबाचे डहाळे, १ डाव तेल, चवीनुसार मीठ केळीची साले काढून प्रत्येक केळ्याचे १६ तुकडे करावेत व ते थोड्या पाण्यात मीठ घालून त्यात केळीच्या फोडी टाकून मंदाग्रीवर त्या शिजवून घ्याव्यात. सर्व पाणी आटून केळ्याच्या फोडी कोरड्या कराव्यात. १/२ नारळ व जिरे बारीक वाटून केळांवर घालावे. सतत हळद, मोहरी घालून फोडणी करावी. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा गुलाबी रंगावर आला, की त्यात खोबरे खवून घालावे व जरा परतावे. त्यात शिजलेली केळी टाकून पुन्हा जरा परतावे व उतरवावे. आता ही भाजी तयार झाली.
केळीचे आणखी काही रुचकर पदार्थ
खमंग बनाना शेव
साहित्य : पाव पेला तांदळाचे पीठ, अर्धा पेला बेसन, १ कचे वाफवलेले केळे, २ चमचे आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा बेकिंग पावडर, मीठ, तेल. कृती : तांदळाचे पीठ, बेसन व सोडा एकत्र चाळणीने चाळून घ्या. त्यात उकडलेले केळे सोलून मिसळा. आले, लसूण-मिरची पेस्ट, मीठ व एक चमचा तेल टाकून मिसळा. कढईत तेल गरम करा. शेव गाळण्याच्या यंत्राने बारीक शेव पाडून तळा.
केळ्याचे गुलाबजाम
साहित्य : एक पेला रवा, अर्धा पेला दूध, २ लहान चमचे पनीर, १ पिकलेले केळे, १ पेला साखर, थोडे, तेल कृती : एक चमचा दुधात केशर भिजवा, रवा परतून घ्या. एका डिशमध्ये पनीर, रवा दूध व केळे घालून मळून घ्या. लिंबाच्या आकाराचे गोळे बनवा. कढईत तेल गरम करून सोनेरी रंगावर तळून घ्या. एका भांड्यात १ पेला साखर व १ पेला पाणी उकळून पाक तयार करा. पाकात केशर घाला. कळ्याच गुलाबजाम पाकात घालून लगेच खाण्यास द्या.
केळ्याची बाकरवडी साहित्य
६ कची केळी, २ लहान चमचे आले मिरची पेस्ट, एका लिंबाचा रस, २ पेले मैदा, २ लहान चमचे चिरलेली कोथिंबीर, २ चमचे तेल, चवीला मीठ, तळण्यासाठी तेल. कृती : केळी वाफवून घ्या. त्यानंतर ती सोलून कुस्करा. त्यात आले मिरची पेस्ट लिंबाचा रस मीठ, कोथिंबीर घालून मळून घ्या व दोन भाग करा. मैद्यात मीठ व तेल मिसळून व मळून घ्या. याचेही दोन भाग करा, एक भाग चपातीप्रमाणे लाटा व केळ्याचे मिश्रण त्यावर पसरून गुंडाळी करा व कडा बंद करा. आता या रोलचे स्लाइस करा व गरम तेलात तळून घ्या.
कैरीची गोड चटणी करण्यासाठी कैरी स्वच्छ धुऊन त्याची साल काढावी.कैरीचा गर तुकडे करून किंवा किसून काढावा किंवा कैरी शिजवून त्यांचा गर काढावा.कैरीच्या एक किलो गराची चटणी करताना एक किलो साखर, 20 ग्रॅम मीठ, 90 मि.लि. व्हिनेगर मिसळावे.एका मलमलच्या कापडात 30 ग्रॅम वेलची + दालचिनी, 15 ग्रॅम मिरची पूड, 15 ग्रॅम आले, 60 ग्रॅम बारीक कांदा, 15 ग्रॅम लसूण बांधून ही पुरचुंडी गर शिजवताना त्यात सोडावी. साधारणपणे 20 मिनिटांनी मसाल्याच्या पदार्थाची पुरचुंडी पिळून बाहेर काढून चोथा फेकून द्यावा. हे मिश्रण शिजवून जॅम सारखे घट्ट झाल्यानंतर गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या बरणीमध्ये भरून ठेवावे.
आमचूर
ज्या कैऱ्या कमी प्रतीच्या आहेत किंवा मार लागलेल्या आहेत, वादळात पडलेल्या आहेत किंवा पिकल्यानंतर आंब्याची प्रत चांगली येणार नसेल, तसेच गावरान व पूर्ण वाढ झालेल्या आंबट कैऱ्या आमचूर बनविण्यासाठी निवडाव्यात.
प्रथम कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुऊन तीक्ष्ण चाकूच्या साहाय्याने गराच्या फोडी कराव्यात. या फोडी नंतर उन्हात किंवा वाळवणी यंत्रात सुकवाव्यात. त्या नंतर ग्राइंडर मशिनमधून त्याची पावडर करावी.
स्क्वॅश
निवडक कैऱ्या शिजवाव्यात. त्याचा गर काढावा. कैरीचा गर 25 टक्के (250 ग्रॅम) साखर 45 टक्के (275 ते 300 ग्रॅम), सायट्रिक आम्ल 1.2 टक्का (चार ते पाच ग्रॅम) व पाणी 30 टक्के (300 मि.लि.) एकत्र करावे.
स्क्वॅश तयार झाल्यानंतर एक मि.मी.च्या चाळणीतून गाळावा. त्यामध्ये 610 मिलिग्रॅम पोटॅशिअम मेटाबायसल्फाईट प्रति किलो स्क्वॅश या प्रमाणात मिसळावे.
स्क्वॅश भरलेल्या बाटल्यांचे उकळत्या पाण्यात (100 अंश सेल्सिअस तापमान) 30 मिनिटे पाश्चरीकरण करावे. नंतर बाटल्या बंद करून थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात. स्क्वॅशचा स्वाद घेण्यापूर्वी त्यात 1ः3 प्रमाणात पाणी मिसळावे.
मुरांबा
मुरांबा तयार करण्यासाठी कैरी मगसदार, कमी रेषा असलेली गोडसर, परंतु अपक्व असावी.
प्रथम कैरीची साल काढावी. त्यानंतर आवडीप्रमाणे फोडी किंवा किस (एक किलो) तयार करावा. हा कीस वाफवून घ्यावा.
फोडीच्या वजनाच्या प्रमाणात साखर (एक किलो) व पाणी (1.5 लिटर) घेऊन साखरेचा (40 अंश ब्रिक्स)पर्यंत पाक करावा.
पाक थंड करण्यासाठी ठेवावा नंतर त्यात वाफवलेल्या आंब्याच्या फोडी घालाव्यात. हे मिश्रण एक दिवस तसेच ठेवावे.
दुसऱ्या दिवशी पाकातील फोडी वेगळ्या काढून उरलेल्या पाकातील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण 50 अंश ब्रिक्स होईपर्यंत पाक उकळावा. पुन्हा हे मिश्रण एक दिवस तसेच ठेवावे. तिसऱ्या दिवशी पाकातील फोडी वेगळ्या काढून उरलेला पाक 72 अंश ब्रिक्स होईपर्यंत उकळावा. थंड झाल्यावर आंब्याच्या फोडी घालाव्यात. तयार मुरांबा काचेच्या बरणीत भरून ठेवावा.
पन्हे
पूर्ण वाढ झालेली कैरी चांगली शिजवावी. कैरी थंड झाल्यावर त्याचा गर काढावा. त्यामध्ये पुढील घटक मिसळून पन्हे तयार करावे. एक किलो आंबा पन्हे तयार करण्यासाठी 20 ग्रॅम कैरीचा गर, 150 ते 175 ग्रॅम साखर आणि 625 ते 650 मि.लि. पाणी मिसळावे.
हे मिश्रण एक मि.मी.च्या चाळणीतून गाळून घ्यावे. पन्हे जास्त काळ टिकावे म्हणून प्रति किलो पन्हात 140 मिलिग्रॅम पोटॅशियम मेटाबायल्फाईट हे परिरक्षक मिसळावे. हे पन्हे गरम असताना निर्जंतुक केलेल्या बाटल्यांत भरावे.
कु. निवेदिता डावखर – 02132-282080 (लेखिका कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, जि.पुणे येथे गृहविज्ञान विषयतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)
द्राक्षापासून बेदाणा
द्राक्षापासून बेदाणा
चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार करावयाचा असेल, तर बेदाणे तयार करतेवेळी एकसारख्या आकाराचे, रंगाचे घड बागेतून तोडावेत. घड काढण्यापूर्वी मण्यामध्ये साखरेची गोडी उतरली आहे याची खात्री करून घ्यावी, कारण चांगल्या प्रतीचा बेदाणा म्हटल्यास त्यात गोडी जास्त असावी लागते. काढलेली द्राक्षे शक्यतो सुरवातीला स्वच्छ पाण्यातून काढून घ्यावी. त्यानंतर ही द्राक्षे 25 ग्रॅम पोटॅशिअम कार्बोनेट अधिक 15 मि.लि. ईथाइल ओलिएट (डीपिंग ऑइल) प्रति लिटरच्या द्रावणात दोन ते चार मिनिटे बुडवून ठेवावीत. या द्रावणाचा सामू 11 पर्यंत असावा. तद्नंतर द्रावणातून काढलेली द्राक्षे सावलीमध्ये जाळीवर सुकवावीत.
वातावरणातील तापमानानुसार 15 ते 22 दिवसांत चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार होऊ शकतो. चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार करायचा असेल, तर जास्त तापमान (35-40 अंश से.) व कमी आर्द्रता (30 टक्केपेक्षा कमी) असल्यास त्याचे परिणाम चांगले मिळतात. वाऱ्याचा वेग कसा आहे, यावरसुद्धा बेदाण्याची प्रत अवलंबून असते. हवा खेळती असल्यास कमी वेळेत चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार होतो. अधिक माहिती हवी असल्यास तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे.
– 020 – 26914245 राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे
डाळ मिल
डाळ मिल
पीकेव्ही मिनी डाळ मिलची क्षमता दर दिवसाला (आठ तास) तुरीकरिता 8 ते 10 क्विंटल (72 टक्के उतारा), मूग- उडिदाकरिता 10 ते 12 क्विंटल (82 टक्के उतारा) अशी आहे. या यंत्रामध्ये भुसा आणि पावडर, चुरी, डाळ, गोटा आणि डाळ अशा चार भागांत यांत्रिकतेने विभाजन करण्याची सोय आहे. यामध्ये तेल तसेच पाण्याच्या प्रक्रियेची सोय आहे. काळ्या ज्वारीला चकाकी आणण्यासाठी, पावसामुळे अंशतः खराब झालेल्या मुगाला स्वच्छ करून चकाकी आणण्याकरिता, गहू स्वच्छ करण्याकरिता पीकेव्ही मिनी डाळ मिलमध्ये लेदर रोलरचा वापर करता येतो.
संपर्क – 0724- 2258462 कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
ज्वारीपासून पापड, बिस्किटे
ज्वारीपासून पापड, बिस्किटे
भाकरीतील प्रथिनांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय घटक (रेझिस्टंट स्टार्च), शर्करा आणि खनिजद्रव्ये अधिकतम आढळतात. ज्वारीच्या दाण्यातील गुणप्रत अनेक भौतिक, रासायनिक व प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या बाबीवरती अवलंबून असते. आपल्याकडे प्रामुख्याने ज्वारीचा उपयोग ज्वारीची भाकरी म्हणूनच मोठ्या प्रमाणात करतात. तसेच काही वाणांचा उपयोग लाह्या, हुरडा, पापड, बिस्किटे अशा खाद्य पदार्थांसाठी होऊ शकतो.
ज्वारीचे विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी प्रथम त्याचे बारीक पिठामध्ये रूपांतर केले जाते. ज्वारीच्या दाण्यामध्ये लायसीन हे अमिनो आम्ल अतिशय कमी प्रमाणात असल्यामुळे ज्वारीच्या प्रथिनांची प्रत कमी दर्जाची समजली जाते, तसेच पिठास खरबरीतपणा अधिक (कोर्स) असल्यामुळे लोकांची पसंती कमी असते. या अडचणीवर मात करण्यासाठी, उपलब्ध ज्वारीची उपयोगिता किंवा मूल्यवर्धन वाढविण्यासाठी ज्वारीच्या पिठात ज्वारीचेच माल्ट किंवा आंबविलेले पीठ वापरणे फायद्याचे ठरते.
ज्वारीमध्ये लायसीन आणि मिथिओनाईन ही अत्यावश्यक अमिनो आम्ले तसेच ज्वारीच्या पिठाची पौष्टिक मूल्ये ज्वारीला मोड आणून किंवा त्याच्या पिठाचे आंबविणे करून (फर्मिनटेशन) वाढविता येतात. ज्वारी दाणे दहा तास पाण्यात भिजवून नंतर 24 तास मोड येण्यास ठेवले असता चांगले माल्टिंग होते.
ज्वारीच्या पिठामध्ये सोयाबीनचे माल्टयुक्त पीठ, नाचणीचे माल्टयुक्त पीठ मिसळून त्यापासून पदार्थ बनविल्यास मानवी शरीरास आवश्यक असणारी सर्व अमिनो आम्ले आणि इतर घटक पदार्थ विपुल प्रमाणात उपलब्ध होतात. मूल्यवर्धन करून तयार केलेले ज्वारीचे पीठ चांगल्या प्रकारे व्हॅक्यूम पॅक केले असता त्याची साठवणक्षमता सहा महिन्यांपर्यंत अत्यंत चांगली राहते. अशा पिठापासून आपणास केव्हाही भाकरी, पराठे, थालीपीठ, वडे किंवा इतर पदार्थ तयार करता येतात. अशा प्रकारच्या पिठापासून बनविलेल्या पदार्थांपासून त्वरित ऊर्जा, प्रथिने व इतर जीवनसत्त्वे उपलब्ध होऊन पचनक्रियेस वेळ न लागता शरीरास लवकर उपलब्ध होतात.
हुरडा
रब्बी हंगामात थंडीच्या मोसमात ज्वारीचे दाणे हिरवट, परंतु दुधाळ अवस्थेच्या पुढे जाऊन पक्व होण्याच्या अगोदरच्या अवस्थेत (सॉफ्ट डफ) असतात, त्या वेळेला भाजलेल्या (होरपळलेल्या) अवस्थेत अतिशय चवदार, मऊ व गोडसर लागतात, त्यास ज्वारीचा हुरडा असे म्हणतात. हिरव्या दाण्यांचा हुरडा अतिशय चांगला लागतो, कारण त्या वेळेला त्या दाण्यांमध्ये मुक्त अमिनो आम्ले, साखर, विद्राव्य प्रथिने, जीवनसत्त्वे यांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे असे दाणे गोवऱ्यांच्या उष्णतेवरती भाजले असता दाण्यांतील विविध रासायनिक घटकांची विशिष्ट रासायनिक प्रक्रिया होऊन “कॅरमलायझेशन’मुळे दाण्यांस एक प्रकारची स्वादिष्ट चव प्राप्त होते.
हुरड्यामध्ये लिंबू, मीठ, साखर, तिखट, मसाला यांसारखे पदार्थ वापरून त्याची चव द्विगुणित करता येते. खास हुरड्यासाठी गोडसर, रसाळ आणि भरपूर दाणे असणाऱ्या फुले उत्तरा या वाणाची शिफारस संशोधन केंद्रामार्फत करण्यात आलेली आहे. सध्या ज्वारीच्या हुरड्याची लोकप्रियता वाढत चाललेली आहे.
लाह्या
ज्वारीपासून लाह्या बनविण्यासाठी प्रामुख्याने त्या ज्वारीच्या दाण्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण अधिक असणे गरजेचे आहे. कारण अशा प्रकारचे दाणे अति उच्च तापमानात एकदम गरम केले असता दाण्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन ते दाण्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळे दाण्यातील स्टार्च फुलला जाऊन त्याचा बस्ट होतो व पुढे त्याची लाही तयार होते.
जेवढ्या प्रमाणात स्टार्च दाण्यामध्ये अधिक असेल, त्या प्रमाणात लाहीचे आकारमान होते. त्यासाठी उच्च तापमानाची आवश्यकता असते. लाह्यांसाठी वॅक्सी ज्वारीच्या वाणाची निवड करावी, कारण त्यापासून मोठ्या आकारमानाच्या पांढऱ्या शुभ्र लाह्या मिळतात. ज्वारीच्या लाह्या सध्या “लोकॅलरी हाय फायबर स्नॅक फूड’ म्हणून लोकप्रिय आहेत. या लाह्या अधिक चवदार होण्यासाठी विविध मसाल्यांचे पदार्थ वापरून चविष्ट लाह्या तयार करणे, तसेच या लाह्या अधिक काळ चांगल्या कुरकुरीत चवदार राहण्यासाठी व्हॅक्यूम पॅकेजिंग तंत्राचा वापर करण्याचे प्रयोग चालू आहेत. काही भागामध्ये ज्वारीच्या लाह्यांचे पीठ करून ते ताकाबरोबर खाण्याची प्रथा आहे. मक्याच्या लाह्यांप्रमाणेच ज्वारीच्या लाह्या करून वर्षभर विकण्याचा व्यवसाय करणे शक्य होऊ शकते
पापड, भातवडी
ज्वारीमधील आहारमूल्यांचा उपयोग मानवी शरीरास होण्यासाठी ज्वारीचे उत्कृष्ट पौष्टिक पापड किंवा भातवडी बाजारात आणणे गरजेचे आहे. ज्वारीच्या माल्टयुक्त पिठापासून, तसेच नाचणीच्या, सोयाबीनच्या माल्टयुक्त पिठापासून पापड किंवा भातवडी तयार केली असता त्यापासून भरपूर प्रमाणात आहारमूल्ये मिळू शकतात. खेडेगावात ज्वारीचे दाणे आंबवून त्यापासून चीक तयार करून त्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ टाकून शिजवतात आणि नंतर पातळ कापडावर किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर पातळ थर देऊन पापडाच्या आकाराच्या भातवड्या तयार केल्या जातात. या भातवड्या भाजून किंवा तेलात तळून स्नॅक फूड म्हणून वापरल्या जातात. याप्रमाणेच ज्वारीचे पापड तयार करताना पापडखार आणि इतर मसाल्याचे पदार्थ वापरून लहान-मोठ्या आकाराचे पापड तयार करतात. हाय फायबर, लो कॅलरीज, हाय प्रोटिनयुक्त माल्टच्या पापडांचा किंवा भातवड्यांचा आरोग्याच्या दृष्टीने निश्चितच चांगला फायदा होऊन त्यास चांगली मागणी मिळू शकेल.
बिस्कीट आणि कुकीज
बिस्कीट आणि कुकीजची निर्मिती प्रामुख्याने गव्हाच्या मैद्यापासून केली जाते; परंतु काही प्रयोगाअंती असे दिसून आले आहे, की मैद्यामध्ये साधारणतः 20 टक्क्यांपर्यंत आपण ज्वारीचे पीठ वापरून बिस्किटे व कुकीज चांगल्या प्रतीची करू शकतो. मधुमेह पेशंटसाठी हाय फायबर, लो कॅलरीज बिस्कीट किंवा कुकीज बनविण्यासाठी साखरविरहित, क्रीमविरहित, प्रथिनयुक्त असे घटक पदार्थ वापरता येतील, तसेच त्याची पौष्टिक मूल्ये वाढविण्यासाठी नाचणी, सोयाबीन, ज्वारीच्या माल्ट पिठाचा वापर करता येईल. अशा प्रकारच्या बिस्किटांची निर्मिती करून ज्वारीचे मूल्यवर्धित पदार्थांत रूपांतर करता येईल. ः डॉ. उत्तम चव्हाण, 02426- 243253
फलोत्पादन मालाचे संकलन प्रतवारी व पेकिंग गृह उभारणी
फलोत्पादन मालाचे संकलन प्रतवारी व पेकिंग गृह उभारणी
नाव
फलोत्पादन मालाचे संकलन प्रतवारी व पेकिंग गृह उभारणी (कृषी विभाग महाराष्ट्र शासन )
योजना काय आहे
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान / संरक्षित उत्पादन
अनुदान स्वरूप
सर्व साधारण क्षेत्रासाठी ४० % किवा कमाल ६ लाख आणि डोंगराळ व अधिसूचित भागासाठी ५५ % किवा कमाल ८.२५ लाख या पैकी कमी असेल ती रक्कम देण्यात येईल .
अनुदान कोणाला भेटनार
वयक्तिक शेतकरी शेतकरी समूह , संस्था , कंपनी , बचत गट , सहकारी संस्था , महामंडळ , स्थानिक स्वराज्य संस्था , कृषी विज्ञान केंद्र , कृषी उत्पन्न बझार समिती .
अनुदान मिळवण्याचे नियम
बँक कर्जाशी निगडीत , बँक अप्रयजल जोडणे बंधनकारक , आर्थिक दृष्ट्या सक्षम असणे बंधनकारक इत्यादी .
कोणती प्रमाणपत्र लागणार
७/१२ ८-अ उतारा , प्रकल्प अहवाल , बँक कर्ज मंजुरी पत्र , ओलिताची शास्वत सोय इत्यादी .
कोणाशी भेटावयास लागेल
तालुका कृषी अधिकारी , उप विभागीय कृषी अधिकारी , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना
मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना
आंबा, कांदा, कडधान्य व तेलबियांवर मोठ्या प्रमाणावर अन्न प्रक्रिया, द्राक्ष, संत्रा, डाळिंब, काजू, स्टॉबेरी, टॉमेटो, ऊस, दुग्धोत्पादन, मासेमारी, कुक्कटपालन यांचे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्पादन ही महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्रात अन्नाची नासाडी टाळण्यासाठी तसेच प्रक्रिया उद्योगास चालना देण्यासाठी राज्य पुरस्कृत ‘मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना’ आणि केंद्र पुरस्कृत ‘प्रधानमंत्री किसान संपदा योजना’ लागू केल्या आहेत.
शेतीमालाचे मुल्यवर्धन करण्याकरिता शेतकऱ्यांच्या सहभागाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहन देणे. उत्पादित अन्न पदार्थांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, उर्जेची बचत व्हावी, यासाठीच्या प्रकल्पांच्या आधुनिकीकरणास प्रोत्साहन देणे, अन्न प्रक्रियेद्वारे उत्पादित मालाची ग्राहकांमध्ये पसंती निर्माण करणे, बाजारपेठ निर्माण करणे व निर्यातीस प्रोत्साहन देणे, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रियेकरिता प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मिती करणे, ग्रामीण भागात लघु व मध्यम अन्न प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य देणे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे अशी या योजनेची उद्दिष्टे आहेत.
शासन निर्णय दिनांक 20 जून 2017 नुसार सन 2017-18 या आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षाकरिता ‘मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना’ लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत कृषी व अन्न प्रक्रिया प्रस्थापना, स्तरवृद्धी व आधुनिकीकरण, शीतसाखळी योजना, मनुष्यबळ निर्मिती व विकास योजना आणि राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियानांतर्गत मंजूर परंतु प्रलंबित प्रकल्पांकरिता देय उर्वरित अनुदानाची रक्कम मंजूर करणे या चार उपघटकांकरिता अर्थसहाय्य देय राहणार आहे.
कृषी व अन्न प्रक्रिया प्रस्थापना, स्तरवृद्धी व आधुनिकीकरण आणि शीतसाखळी योजना
याअंतर्गत फळे, भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्य, तेलबिया उत्पादने इत्यादींवर आधारित प्रक्रिया उद्योग पात्र आहेत. यासाठी पुढीलप्रमाणे पात्र संस्था असतील – फळे, भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्य, तेलबिया उत्पादने इत्यादींवर आधारित प्रक्रिया प्रकल्प चालविणारे किंवा स्थापित करीत असलेले शासकीय / सार्वजनिक उद्योग, सक्षम शेतकरी उत्पादक कंपनी / गट, महिला स्वयंसहाय्यता गट, खाजगी उद्योग क्षेत्र, ग्रामीण बेरोजगार युवक, सहकारी संस्था अशा अन्न प्रक्रिया प्रकल्पांपैकी फळे व भाजीपाला यासारख्या नाशवंत शेतमालाच्या प्रक्रियेच्या प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येईल.
अर्थसहाय्य –
प्रकल्प उभारणीसाठी बांधकाम व यंत्रे यांच्या खर्चाचा 30 टक्के व कमाल 50 लाख रूपये अनुदान देण्यात येईल. अनुदान क्रेडीट लिंक्ड बँक एन्डेड सबसिडी या तत्त्वांनुसार दोन समान वार्षिक हप्त्यात येईल. यासाठी मंजूर अनुदानाच्या रकमेपेक्षा कर्जाची रक्कम किमान दीडपट असावी.
मनुष्यबळ निर्मिती व विकास योजनेंतर्गत अन्न प्रक्रियाकरिता उद्योग पात्र असून प्रशिक्षण शुल्काच्या 50 टक्के अर्थसहाय्य आहे.
राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियानांतर्गत मंजूर, भौतिकदृष्ट्या उत्पादन सुरू असलेल्या तथापि अनुदान प्रलंबित असलेल्या प्रकल्पांकरिता देय उर्वरित अनुदानाची रक्कम त्या योजनेचे प्रचलित निकषाप्रमाणे मंजूर करणे या अंतर्गत अनुदान प्रलंबित असलेले प्रकल्प उद्योग पात्र आहेत. उर्वरित अनुदानाची रक्कम त्या योजनेच्या प्रचलित निकषाप्रमाणे मंजूर करणे असे अर्थसहाय्य आहे.
अधिक माहितीसाठी मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. या योजनेच्या माध्यमातून अन्नाची नासाडी टाळण्याबरोबरच प्रक्रिया उद्योगास चालना मिळणार आहे, हे मात्र निश्चित !
– संप्रदा द. बीडकर
फार्महब वर उपलब्ध माहिती ही लोकांनी पुरवलेली असून विविध स्रोतांतून संकलित केलेली आहे. आम्ही या माहितीची हमी किंवा जबाबदारी घेत नाही.